मुंबई : प्रतिनिधी
अरबी समुद्रातील नियोजित स्मारकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आलेली नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे विधानसभेत करताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भलतेच संतापले आणि म्हणाले की, पुतळ्याची उंची कमी केल्याचे पत्र दाखवू का ? नाही तर तुमच्या विरोधात हक्कभंग आणेन असा संतप्त इशारा दिला.
विधानसभेत नियमित कामकाजाच्या कालावधीत स्मारकावरील नियोजित शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित करत स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र या विषयावर उद्या ३९५ अन्वये चर्चेचा प्रस्ताव दाखल करावा आणि चर्चा करावी अशी सूचना अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विरोधकांना केली. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग ही केला.
तरीही संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या उंची कमी करण्याचा प्रश्न नसल्याचे सांगत जगातील सर्वाधिक उंचीचे स्मारक असल्याचे एका निवेदनाद्वारे सांगितले.
त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडी सरकारच्या काळात ज्या आराखड्याला मंजूरी देण्यात आली होती. त्या आराखड्यात बदल करत स्मारकाचा खर्च कमी करण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावर मुख्यमंत्री फ़डणवीस म्हणाले की, पुतळा आणि चौथरा यांची एकत्रितपणे उंची मोजले जाते. तसेच याचे प्रमाण ६०-४० असे असून त्यासच मान्यता देण्यात आले आहे. त्याचबरोबर हा आराखडा सरकारने नव्हे तर जे.जे.स्कूल ऑफ आर्टस् ने बनविला आहे. त्यामुळे त्यात राजकारण किंवा खर्च कमी करण्याचा प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या या खुलाशावर पृथ्वीराज चव्हाण हे अधिकच संतप्त झाले आणि माझ्याकडे पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचे पत्र असून ते दाखवू का? असा सवाल करत तुमच्या विरोधात हक्कभंग आणेन असा संतप्त इशारा दिला.
अखेर यात अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हस्तक्षेप करत आता चर्चा कशाला उद्या करा अशी सूचना केली.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांनी तुमच्या काळात साधी एक वीट रचली नसल्याची टीका केली. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचा आक्रमक पवित्रा पाहून पृथ्वीराज चव्हाण यांना सोबत घेवून त्यांचे समाधान होईपर्यत चर्चा करणार असल्याचे अखेर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.