साताराः प्रतिनिधी
पक्षातील कुणी मंडळी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा! असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गयाराम आणि गयारामाच्या तयारीत असलेल्यांना लगावत राजकारणात कधी कधी असा प्रसंग येतो, त्याचा सामना करायचा मला अनुभव आहे. एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते चालले आहेत हे त्यांनी जाहीर केले ते बरे झाले असे आश्वासक उद्गारही त्यांनी काढले.
सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. त्यानंतर सातारा दौऱ्यावर शरद पवार आले होते. त्यावेळी आय़ोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्ष सोडताना कामं होत नसल्याची कारणं दिली आहेत. ते एक बरंच झालं. सत्ताधारी सूडबुद्धीनं वागताहेत आणि विरोधक त्यांना तोंड देऊ शकत नाहीत असा निष्कर्ष यातून निघतो असेही ते म्हणाले.
साताऱ्यातून आणखी किती लोक पक्ष सोडून जाणार आहेत याची मला कल्पना नाही. मात्र, यशवंतराव चव्हाणांचा विचार ज्यांनी स्वीकारलाय ते असं काही करणार नाहीत. त्यांना विरोधात असल्याचा त्रास होईल. मात्र, त्यांची नाळ मतदारांशी असल्यानं चिंता करण्याची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्याचा कोणताही परिणाम साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर होणार नाही. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी माझ्याकडे तीन अर्ज आले आहेत. मला उमेदवारांची चिंता नाही. ही जागा राष्ट्रवादी निश्चित राखेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपमध्ये जाणार नाही असं शिवेंद्रराजेंनीच मला सांगितलं होतं. साताऱ्याच्या खासदारांसोबत बैठक व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. संसदेच्या अधिवेशनानंतर चर्चा करू असं आमचं ठरलं होतं. मात्र, त्याआधीच त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Tags bjp ncp sharad pawar shivendra raje bhosale
Check Also
प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …