मुंबई : प्रतिनिधी
केंद्र सरकारने राज्यासह संपूर्ण देशभरातील सहकारी साखर कारखान्यांसाठी आणि साखरेच्या उत्पादनासाठी ८ हजार ५०० कोटी रूपयांचे पँकेज जाहीर केले. मात्र केंद्राकडूनच यासंदर्भात जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकात साखर कारखाने आणि साखर उत्पादनासाठी ७ हजार कोटी रूपयांचे पँकेज जाहीर करण्यात आल्याची चूकीची माहिती प्रसिध्द करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सदरची चूक लक्षात आणून दिली.
साखर कारखान्यांना मदत म्हणून १५४० कोटी रूपयांचा निधी, ३० लाख साखरेच्या बफर स्टॉकसाठी ११७५ कोटी रूपये, इथेनॉलच्या उत्पादनाच्या अनुषंगाने ४०४७ कोटी रूपयांची तरतूद केल्याचे प्रसिध्द पत्रकात नमूद करण्यात आल्याची बाब पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली.
याचबरोबर साखरेसाठी देण्यात येत असलेल्या २ रूपये अनुदानाच्याबाबत ही शरद पवारांनी निदर्शनास आणून दिली आहे. याशिवाय इथेनॉलची सध्या असलेली प्रति लिटर किंमतीत वाढ करावी अशी मागणी करत ५३ रूपये इतका दर वाढवावा अशी मागणी करत इथेनॉलवर आकारण्यात येत असलेल्या जीएसटीच्या दरातही घट करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.