भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याचे वक्तव्य केले. यावरून महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाचे राजकिय नाट्य रंगले असतानाच दिल्लीतील एका वृत्तवाहिनीवरील चर्चे दरम्यान भाजपाच्या प्रवक्त्याने सावरकरांच्या माफीचे समर्थन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच वेळा औरंगजेब यांची माफी मागितल्याचा दावा केला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान भाजपाच्या या प्रवक्त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे.
सावरकरांच्या माफीनाम्याचं प्रकरण ताजं असताना आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्तविधान केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबला पत्र लिहिलं होतं. त्या काळात राजकीय अडचणीतून बाहेर येण्यासाठी अनेक लोकं माफीनामा लिहायचे असं विधान त्रिवेदी यांनी केले. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा हा व्हिडीओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं बोलणारा भाजपा प्रवक्ता वेडाच असू शकतो असा खोचक टोला लगावला आहे.
शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबा ची पत्र लिहून माफी मागितली होती असा म्हणणारा ठार वेडाच असू शकतो … बोलणारा #भाजप प्रवक्ता pic.twitter.com/QzkPtsVdrK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2022
राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले, सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, मात्र त्यांनी ब्रिटीश सरकारमध्ये जात शपथ तर घेतली नाही ना असं सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या काळात अनेक लोकं प्राप्त परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? असा सवाल करत पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती असे वक्तव्य त्रिवेदी यांनी केले.