Breaking News

अजित दादा म्हणाले, आम्ही पवारसाहेबांशी बोललो त्यांनी आम्हाला सांगितले… काहीजण जाणीवपूर्वक बातम्या पसरवून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न

शरद पवार व पंतप्रधान यांची दिल्लीत भेट झाली. त्यानंतर पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन भेटीचे कारण स्पष्ट केले आहे त्यामुळे त्या भेटीचा पुनरुच्चार मी करावा असं मला वाटत नाही असे सांगतानाच नवाबभाई व अनिल देशमुख यांच्याबाबत विचारले नाही असे जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याबाबत आम्ही पवारसाहेबांशी बोललो. पवारसाहेबांनी सर्व विषयावर पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे स्पष्टपणे आम्हाला सांगितल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
कुठल्याही देशाचा, राज्याचा अर्थसंकल्प ज्यावेळी सादर केला जातो, त्यावेळी तो अंदाज असतो. यावर्षी राज्यांमध्ये याप्रकारे उत्पन्न मिळेल. त्यानुसार खर्च करु ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. दोन वर्ष कोरोनाची गेली त्यामुळे त्याचा अंदाज व्यक्त केला गेला. त्या – त्या वर्षी अंदाजापेक्षा कमी उत्पन्न मिळाले त्यामध्ये सरकारचा दोष नसतो उलट रिसोर्सेस वाढवण्याकरिता आपण प्रयत्न केला. आपण ३ कोटी ६२ लाख रुपये सांगितले होते त्याच्यातून ३ कोटी २५ लाख रुपये जमा केलेले आहेत. मागील वर्षी एकूण उत्पन्न २ कोटी ६९ लाख रुपये आहे. त्या तुलनेत ३ कोटी २५ लाख रुपये उत्पन्न जमा झालेले आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
कुठल्याही राज्याची मोजपट्टी आपण कुठे लावतो तर साधारण उत्पन्नाच्या ३ टक्के कर्ज काढता येते. कर्ज काढण्याचे प्रमाण राज्याने ३ टक्क्यांच्या आतच ठेवले. कोरोनाच्या काळात ते ४ टक्क्यावर नेण्याची मुभा देशाच्या अर्थमंत्र्यांनी दिली होती. मात्र महाराष्ट्र राज्याने तो मार्ग अवलंबला नाही. उलट देशाने साडे सहा टक्के कर्ज उचलले म्हणजे आपल्यापेक्षा दुप्पट कर्ज उचलले. त्यांना काही समस्या असतील त्यावर टिका टिपण्णी करण्याचं कारण नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. विविध पक्षाचे खासदार भूमिका मांडतील आमच्या परीने गॅसच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु कमी किंमती केल्या तरी पुन्हा पेट्रोल – डिझेल व गॅसच्या किंमती वाढतच आहेत. सध्या त्याचा आकडा कुठच्या कुठे जात आहे. यावर विविध पक्षाचे लोक आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादीनेही आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री महोदयांनी गुढीपाडव्यापासून संपूर्ण राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवले. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जनता दरबार, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी असे कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यानुसार आज गुरूवारी स्वत: सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तसेच मावळ व खारघर विभागातील कार्यकर्त्यांनी व काही मान्यवर कलावंतांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
इम्तियाज जलील यांनी केलेल्या टिकेसंदर्भात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवारांनी संजय राऊत यांच्यासाठी पंतप्रधानांशी भेट घेतली मात्र नवाब मलिक व अनिल देशमुख यांचा त्यांना विसर पडला असा प्रश्न केला असता अजित पवार यांनी काहीजण जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या बातम्या पसरवून विपर्यास करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड संदर्भात बोलताना अजित पवार यांनी सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. आम्ही आमच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांना हा विषय सांगितला आहे. तसेच मेट्रो प्रशासनाशीही चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याची आमची तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एसटी कामगारांचा प्रश्नावर सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल काही अंशी न्यायालयाने त्यावर निर्णय दिला आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय हा सर्वांनीच मान्य करायचा असतो असे सांगत ओबीसी आरक्षणासंदर्भात जोपर्यंत सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सूतोवाच करणे योग्य नाही. जो काही निकाल लागेल त्यावर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही सर्व एकत्र बसून चर्चा करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
आमदारांच्या निधी प्रश्नावर बोलताना कोरोना प्रादुर्भावामुळे निधी वाटपास मर्यादा होत्या. आहे त्या निधीतून राज्य विकासाला आपल्याला खिळ बसवू दयायची नव्हती. मात्र आम्ही जे – जे करता येईल ते – ते केले. कुठच्याही विकास निधींमध्ये आम्ही घट केली नाही. यावर्षी आपण रस्ते व विकास महामंडळाला विक्रमी असा २१ हजार कोटींचा निधी दिला. आपण राज्यामध्ये कुठचाही नवीन कर लावलेला नाही. उलट गॅस सिलिंडरसंदर्भात १ हजार कोटींचा टॅक्स आम्ही माफ केला. काहीजण सांगत आहेत की, राज्याने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करावेत असे असेल तर केंद्रानेही आपले कर कमी करावेत असा उपरोधिक टोला त्यांनी लागवला.

Check Also

प्रियंका गांधी यांचा सवाल,… तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ?

देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *