मुंबई: प्रतिनिधी
भीमा कोरेगांव येथील समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद हाकेला राज्यातील बहुतांष ठिकाणी स्थानिक नागरिकांनी ओ देत दैनंदिन कामकाजावर थांबविण्यास सुरुवात केली आहे. या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, विरार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अनेक शाळा आणि एस.टी,बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबईतील दलित बहुसंख्य असलेल्या घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर, विक्रोळी, मुलुंड, विरार, ठाणे भागात दलित समाजाच्या विविध संघटनांचे कार्यकर्त्ये रस्त्यावर हातात निळे आणि पंचशील रंगाचे झेंडे घेवून दुकानदार, व्यावसायिक वाहन चालकांना बंद मध्ये सहभागी होत सर्व व्यवहार ठप्प ठेवण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. तर ठाणे आणि विरार मध्ये काही काळासाठी आंदोलनकर्त्यांकडून रेल्वे रोको करण्यात आला. मात्र ठाणे आणि पश्चिम उपनगरातून कामाच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांनी बंदला प्रतिसाद देत घरी राहणेच पसंत केले. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकांवर फारशी गर्दी दिसत नव्हती.
तसेच मुंबईच्या रस्त्यावरही फारशी वाहने आणि नागरीकांची वर्दळ कमी स्वरूपात आहे.
याचबरोबर मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी जिल्ह्यात अनेक शाळांना सुट्टी देत दैंनदिन काम बंद ठेवण्यात येत आहेत. त्याचबरोबर या बंदला पाठिंबा म्हणून नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये सर्व लिलाव बंद ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. तर नाशिक येथील कृषी बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
सातारा, पुणे येथे तर एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून स्वारगेट बसस्थानकात शुकशुकाट आहे. त्याचबरोबर या दोन्ही ठिकाणी नागरीकांनी घराबाहेर पडण्याऐवजी घरात बसणेच पसंत केल्याने बंदचा परिणाम ठिकठिकाणी दिसून येवू लागला आहे. दरम्यान कोणतीही अनूचित घटना घडू नये म्हणून सर्व ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.