Breaking News

खुनाची सुपारी देणाऱ्या नगरसेवकाला राज्यमंत्री वाचवतोय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा गौप्यस्फोट

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून भाजपचा डोंबिवलीचा एक नगरसेवक कल्याणच्या नगरसेवकाचा खून करायची १ कोटी रूपयांची सुपारी देतोय. या नगरसेवकाला वाचविण्यासाठी याच सरकारमधील एक राज्यमंत्री वाचविण्याचा प्रयत्न करतोय असा गौप्यस्फोट करत यावरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना विखे-पाटील यांनी वरील गौप्यस्फोट केला.

नागपूरातील कुख्यात गुंड मुन्ना यादव हा नागपूरपासून हाकेच्या अंतरावरील एका फार्म हाऊसवर लपलेला असताना नागपूर पोलिसांना हा गुंड सापडत नाहीत. तसेच या गुंडाला मदत करणाऱ्या कुकरेजाला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास खरे सत्य बाहेर येईल. याशिवाय नागपूरातील कायदा व सुव्यवस्था चांगली असल्याचे दाखविण्यासाठी पोलिसांकडून तक्रारीच घेत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आणत यासंबधी पोलिस महासंचालकच सांगत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.  अनिकेत कोथळे प्रकरणी गृहमंत्र्याने नाही तर किमान गृहराज्यमंत्र्याने राजीनामा द्यायला हवा अशी मागणी करत यापेक्षा कायदा व्यवस्थेचे चांगले उदाहरण काय असू शकेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली म्हणून माझ्यावर १० कोटी रूपयांचा खटला दाखल केला. दाभोळकर-पानसरे हत्येतील आरोपीला जामीन मिळतो काय संदेश देणार आहात असा सवालही त्यांनी केला. तर राज्याचे शिक्षण मंत्री शिक्षणाचा खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न करत असून त्यादृष्टीकोनातूनच त्यांनी १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप करत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू देशमुख हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीशी संबधित असल्यानेच त्यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. मात्र त्यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थेची वाट लावल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज असून नारायण राणे हे मंत्री पदासाठी वाट पहात असून त्यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी द्यावी अशी सूचनाही केली. त्यांना गृहमंत्री पद दिल्याने सरकार काही जाणार नाही. मात्र गृह विभागाचा चेहरा-मोहरा बदलून टाकतील असा उपरोधिक टोला मारत शिवसेनेने आता ९५ वी फारकतीची घोषणा करावी अशी कोपरखळी शिवसेनेच्या सदस्यांना मारली.

यावेळी विखे-पाटील यांनी सरकारला होय आम्ही खरे लाभार्थी असलेले छापील प्रमाणपत्र प्रदान केले. तसेच शिवसेनेच्या सदस्यांना घरी पोस्टाने पाठविणार असल्याचे सांगितले.

 

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *