मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तुंवर रविवारी गुढी पाडव्याच्या दिवसापासून बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत केली. तसेच प्लास्टीक आणि थर्माकॉल पासून ताट, कँप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, स्ट्रॉ, कटलरी, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बँग्ज, स्प्रेड शीट्स, प्लास्टीक पाऊच, पँकेजींग यासह सर्व प्रकारचे प्लास्टीक वेस्टन इत्यांदींच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मात्र बंदीतून औषधाच्या वेस्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टीक, वन व फलोत्पादनसाठी, कृषी, घन कचरा हाताळणे इ. प्रयोजनासाठी लागणाऱ्या रोप वाटीकांमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टीक पिशवी वा प्लास्टीक शिट्स आदींना बंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र त्यावर संबधित कारणासाठी प्लास्टीक वापरासाठी असे लिहिणे बंधनकारक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यातीसाठी विविक्षीत उद्योग इ.मध्ये निर्यातीसाठी प्लास्टीक व प्लास्टीक पिशवीची उत्पादने, उत्पादनाच्या प्रक्रिये दरम्यान अनिवार्य वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टीक आवरण वा पिशवी, दुधाच्या पँकेजिंग आदी कारणांसाठीही प्लास्टीक बंदीला वगळण्यात आल्याचे शेवटी त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर पीईटी व पीईटीई प्लास्टीक बॉटल्सचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पूर्णत: प्रतिबंधित करण्याऐवजी वस्तू व सेवा कर संचालनालयाकडून शुल्क आकारून त्याची वसूली करण्याची सूचना केली. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जास्तीत जास्त २५ हजार रूपयांपर्यंतचा दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.