मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आजपासून तीन दिवस चालणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजाला दांडी मारत काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेतील ८० टक्के आमदार दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे विधानसभेत विरोधी बाके रिकामे-रिकामे झाल्याचे पाह्यला मिळत होते.
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन दिल्लीत होत आहे. राहुल गांधी यांनी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिलेच हे अधिवेशन होत आहे. त्यामुळे आगामी काळात राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यात निवडणूका होवू घातल्या आहेत. त्यातच लोकसभेच्या निवडणूकीलाही फारसा कालावधी राहीला नसल्याने राहुल गांधी पक्षाची आगामी वाटचाल जाहीर करण्याची शक्यता असून राष्ट्रीय कार्यकारणीही जाहीर होण्याची शक्यता आहे.
तसेच या अधिवेशनासाठी प्रत्येक राज्यातून ब्लाँक अध्यक्षापासून ते खासदारांपर्यत सर्वांना अधिवेशनासाठी हजर राहण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. हे अधिवेशन १६ मार्च ते १८ मार्च असे तीन दिवस चालणार आहे. त्यामुळे काही आमदार कालच दिल्लीला रवाना झाले. तर काही आमदार आज संध्याकाळच्या विमानाने दिल्लीला रवाना होत आहेत.
मात्र विधानसभेत आणि विधान परिषदेत किमान आपले अस्तित्व दिसावे यासाठी नसीम खान यांच्यासह काही निवडक आमदार सकाळी उपस्थित राहीले. तर विधान परिषदेत शरद रणपिसे यांच्यासह अन्य काही आमदार उपस्थित राहीले.
विरोधातील सहकारी अर्थात काँग्रेसचे सदस्य फारसे नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही अन्य आमदारांचा अपवाद वगळता बहुतांष आमदार गैरहजर राहीले. त्यामुळे विधानसभेत विरोधक नसल्याचे चित्र दिसत होते.