नक्षलवादी चळवळीशी संबध सहभागी असल्याचा ठपका ठेवत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक प्रा.जी.एन.साईबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे जवळपास १० वर्षे साईबाबा यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते.
बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलेला नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा व त्याच्या सहकार्यांनी सत्र न्यायालयाने दोषी ठरविले होते. तसेच त्यांना सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली होती. त्यास प्रा.साईबाबा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आज त्यांची निर्दोष मुक्तता केली.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रा. साईबाबाला गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याने सत्र न्यायालयाच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्या. रोहित देव व न्या. अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पोलिस तपासात अनेक चुका असून त्यांद्वारे असे लक्षात येते की, साईबाबाला अवैधरित्या अटक करण्यात आली आणि त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले, असा युक्तीवाद बचावपक्षातर्फे करण्यात आला. तर सरकारी पक्षाच्या युक्तीवादानुसार, सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे सबळ असून गुन्हेगारांची शिक्षा कायम ठेवण्यात यावी असा युक्तीवाद करण्यात आला. त्यावर आज न्यायालयाने आपला निर्णय देत प्रा. साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली.
सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून वरिष्ठ अधिवक्ता सिद्धांत दवे यांनी बाजू मांडली. बचावपक्षाकडून वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, अॅड. प्रदीप मानध्यान यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. निहालसिंह राठोड आणि अॅड. बिपीन कुमार यांनी सहकार्य केले.
जवळपास १० वर्षांपूर्वी देशात शहरी नक्षलवादाची मोठी चर्चा चालू होती. यासंदर्भात अनेक ठिकाणी पोलिसांकडून कारवाईही करण्यात आली होती. याच काळात देशभरात गाजलेली गडचिरोली पोलिसांची कारवाई म्हणजे दिल्ली विद्यापीठाचे तत्कालीन प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांना झालेली अटक. त्यावेळी साईबाबा यांच्यासमवेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी हेम मिश्रा यांच्यासह इतर काही आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. माओवाद्यांच्या शहरी नेटवर्कला मोठा धक्का देणारी कारवाई, असं या अटकेचं वर्णन तेव्हा केलं गेलं. मात्र, आता प्राध्यापक साईबाबा यांची मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. एनडीटीव्हीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. हा न्यायालयाचा मोठा निर्णय मानला जात आहे.
प्राध्यापक साईबाबा हे दिव्यंगत्वामुळे व्हीलचेअरवर आहेत. सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ते बंदिस्त असून त्यांची तातडीने मुक्तता करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. त्यांच्याविरोधात इतर कोणता गुन्हा किंवा प्रकरण प्रलंबित नसल्यास, त्यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण करावी, असं न्यायालयानं आपल्या आदेशात सांगितले.