मुंबई : प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील दलित नितीन आगे खून प्रकरणी सर्व साक्षीदार फितूर झाल्याने आरोपींची निर्दोष सुटका झाली. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र नितीनच्या खून प्रकरणात न्याय मिळावा यासाठी त्याच्या आई-वडीलांनी थेट मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. परंतु यामुळे दलित समाजाचा रोष राज्य सरकारवर निर्माण होवू नये यादृष्टीने आगेचे कुटुंबिय मुंबईत आल्याचे कळताच भाजपने पुण्याचे दलित खासदार अमर साबळे यांना याप्रकरणी लक्ष घालण्यास सांगितल्याची नवी माहिती पुढे आली आहे.
आगे खूनप्रकरणी आंदोलन करण्याचा निर्णय नितीनच्या पालकांनी घेतल्यानंतर त्यांची कॉंग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे त्यांची भेट घेवून मुख्यमंत्र्यांच्या भेटीस जाणार होते. मात्र त्याची कुणकूण भाजपला लागताच भाजपने खासदार अमर साबळे यांच्या मदतीने संपूर्ण घटनाच हायजँक करत याप्रकरणात राजकरण करण्यास वावच दिला नाही. तसेच मुणगेकर पोहचण्याआधीच साबळे यांनी नितीन आगेच्या पालकांची भेट घेवून थेट त्यांना मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनात घेवून गेले. त्यानंतरही साबळे यांनी नितीनच्या पालकांना एकटे न सोडता थेट पुण्याला घेवून गेले. त्यामुळे एकदंरीतच आगे प्रकरण राज्य सरकारवर शेकू नये यासाठी भाजपने चांगलीच धावाधाव घेतल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आगे प्रकरणी फितूर झालेल्या साक्षीदारांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करायला हवे होते. मात्र त्याची जबाबदारीही खासदार अमर साबळे यांच्यावरच सोपविण्यात आल्याने यासंदर्भातले प्रसिध्द पत्रकही त्यांनीच जाहीर केले. त्यामुळे याप्रकरणातून राज्य सरकार अंग काढून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, नितिन आगे खून प्रकरणातील फितुर झालेल्या सर्व साक्षीदारावर फेरतपासनी करून गुन्हे दाखल करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांना दिली. तसेच गुन्हे विषयक निष्णात वकिलांची नियुक्ती करून खटला उच्च न्यायालयात चालविण्यात यावा असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्याचे खासदार अमर साबळे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून माहिती दिली.