Breaking News

नामांतर लाँगमार्चचा शनिवारी ४४ वा वर्धापन दिन

औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ऐतिहासिक लाँगमार्चला येत्या शनिवारी ४४ वर्षे पूर्ण होत आहेत.
“गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड”मध्ये नोंद झालेल्या या लाँगमार्चच्या या ४४ वा वर्धापन दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्यभरात शहिदांना मानवंदना देण्यात येणार आहे.

नागपुरात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना सभेचा मुख्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, शहर अध्यक्ष कैलाश बोम्बले, युवक आघाडी प्रदेश संघटक मृणाल गोस्वामी यांनी दिली.

कपिल लिंगायत म्हणाले, मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव महाराष्ट्र च्या विधिमंडळाने संमत केला होता. सरकारने संमत केलेल्या या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी या एकमेव मागणीसाठी लाँगमार्च प्रणेते, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर दीक्षाभूमी ते औरंगाबाद असा ऐतिहासिक लाँगमार्च काढण्यात आला होता. ११ नोव्हेंबर १९७९ रोजी निघालेल्या या लाँगमार्चची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड मध्ये घेण्यात आल्याची माहिती दिली.

कपिल लिंगायत पुढे बोलताना म्हणाले, सदर मार्चमुळे राज्यासह देशभरात नामांतराच्या चळवळीने वेग घेवून सर्वत्र राज्य सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली तसेच ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे, धरणे, रास्ता रोको, जेल भरो आंदोलने झाली या आंदोलनादरम्यान जातीयवाद्या सोबत ठिकठिकाणी उडालेल्या संघर्षात व आंदोलनांमध्ये अनेक ज्ञात-अज्ञात नामांतर वीर शहीद झाले असे सांगितले .

मृणाल गोस्वामी म्हणाल्या की, सदर लाँगमार्चची दखल घेत नागपूर रामबाग इमामवाडा येथे लाँग मार्च चौक उभारण्यात आला. या ठिकाणी सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मानवंदना सभेचे आयोजन करण्यात आले असून प्रा. जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह पीआरपीचे प्रमुख पदाधिकारी आणि भीमसैनिक उपस्थित राहून नामांतर शहिदांना मानवंदना देणार आहेत.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *