मुंबई : प्रतिनिधी
मुंबईला लागून असलेल्या समुद्र आणि समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता राखण्यासाठी अफरोज शेख हे मोठे काम करत आहेत. त्यांच्याकडून सर्वांगिन स्वच्छता राखण्यासाठी एक धोरण तयार करण्यात येत आहे. शेख यांच्याकडून धोरण राज्य सरकारला सादर केले जाईल. त्यानंतर त्यात आणखी संशोधन करून त्या शिफारसींचा समावेश धोरणात करून राज्य सरकार समुद्र आणि समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी सर्वंकष धोरण तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
वर्सोवा बीच येथे स्वच्छतेसाठी अफरोज शाह सुरु केलेली मोहीम पुन्हा सुरु करण्यात आल्यानंतर या मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या प्रसारमाध्यमाशी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत युवासेनेचे अध्यक्ष आदीत्य ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि स्वच्छता मोहिमेचे जनक अफरोज शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले शालेय विद्यार्थी, स्वयंसेवक यांना स्वच्छतेची, नद्या आणि समुद्राच्या संवर्धनाची तसेच निसर्गाच्या रक्षणाची शपथ दिली.
मुंबई शहरातून दररोज साधारण २१०० एमएलडी सांडपाणी समुद्रात सोडले जाते. हे रोखण्यासाठी आपल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार लवकरच मुंबईच्या समुद्रात सोडले जाणारे सर्व सांडपाणी हे प्रक्रिया करुन सोडले जाईल. त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. प्लॅस्टिकमुळेही समुद्रकिनारे आणि समुद्राचे मोठे प्रदूषण होत आहे. प्लॅस्टीकवर निर्बंध आणण्याबाबत येत्या सहा महिन्यात कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत लोकांची मतेही जाणून घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अफरोज शाह यांनी सुरु केलेले सागरी किनारा स्वच्छतेचे काम खूप कौतुकास्पद आहे. काही जणांनी या कामाला विरोध केल्याने त्यांची स्वच्छता मोहीम बंद पडली होती. पण आपल्या आवाहना नंतर अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम पुन्हा सुरु केली आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच आज आपण येथे आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.