महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी आपण सर्वांनी जागतिक महिला दिवस साजरा केला. मात्र, पुण्यातील घटना बघता अजूनही महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात सुरू असलेला लढा आणखी किती दिवस लढावा लागेल, हा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच पुण्यातील या घटनेबाबत महिला आयोग पाठपुरावा करेन आणि आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. याबरोबरच समाजात अशा प्रकारे घटना घडू नये, यासाठी सातत्याने अनिस आणि इतर संघटनांच्या मदतीने महिला आयोगाकडून जनगागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मासिक पाळी सुरू असताना महिलेचा छळ करून अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे (सर्व रा. बीड) यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिला विवाहानंतर बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाईकांनी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. मासिक पाळी दरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. छळामुळे महिला माहेरी निघून आली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली.
नेमकी घटना काय?
मासिक पाळी सुरू असताना महिलेचा छळ करून अघोरी कृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे (सर्व रा. बीड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य, विनयभंग, शारिरिक मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम आदी कलमांनुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार २७ वर्षीय महिला विश्रांतवाडी भागात राहते.
विवाहानंतर ती बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाईकांनी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. मासिक पाळी दरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. छळामुळे महिला माहेरी निघून आली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम तपास करत आहेत.