उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर पुणे यवतमाळच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा मेळावा, निवडणूक आयोगातील लढाई यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही लक्ष्य केलं.
उध्दव ठाकरे म्हणाले, माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली, पण जे खरे अढळ आहेत ते माझ्यासोबत आहेत. ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे तिथे राजकारणातील गद्दार लोक आढळले नाही पाहिजेत, अन्यथा हा शिवनेरीचा अपमान आहे.
गटप्रमुखांच्या मेळाव्यात मी बोलले होतो ते पुन्हा बोलेन. आपल्याला देवाने दिलेली ही एक संधी आहे. देशातील लोकशाही टिकवणं, खरं हिंदुत्व जोपासणं, वाढवणं ही संधी आपल्याकडे आहे. इतिहासात तोतयांचे बंड असं एक प्रकरण आहे, असे काही तोतये फिरत आहेत. पण नुसतं हातात भगवा असून फायदा नाही, तर ह्रदयात भगवा हवा, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दसऱ्याला थोडेच दिवस शिल्लक आहेत. वाजत गाजत, गुलाल उधळत तुम्ही सर्व येणारच आहात. शिस्तीने या अशी विनंती आहे. आपल्याकडून वेडवाकडं करुन घेण्यासाठी ते प्रयत्न करतील, पण तुम्ही सावध राहा, असा सल्लाही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिला.
आपल्याला लढाई जिंकायची आहे, मग ती कोर्टातील असो किंवा निवडणूक आयोगातील असो. पण आम्ही जनतेच्या मनाला महत्व देतो. त्यांच्या मनातील लढाई आपण जिंकलीच आहे. लोकांच्या भावना तशाच कायम ठेवा असंही ते म्हणाले.