राज्यातील शिवसेना कोणाची यावर आज सर्वोच्च न्यायालयात सकाळपासून सुनावणी सुरु आहे. उध्दव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यावर पुढील सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेचा याचिकांवर निकाल द्यावा मात्र शिवसेनेबाबतची सुनावणी निवडणूक आयोगाने घ्यायला परवानगी द्यावी यावरून मागणी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर उस्मानाबाद येथील शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणाले, मला आई भवानी आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे. कितीही अफझल खान आले तरी घाबरणार नाही असे सांगत अमित शाह आणि बंडखोरांवर त्यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.
सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला पुढील प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी द्यायची की नाही यावर आज सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे.
यावेळी बोलताना शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले की, मला आई भवानी, न्यायदेवतेवर विश्वास आहे. विजय आपलाच होणार आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही.
उस्मानाबाद येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. तेव्हा आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.
आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही. दसऱ्याला आपण भेटणार आहोत. एक चांगली सुरूवात झाली आहे. न्यायालयात दुसरी केस सुरु आहे. माझा आई भवानीवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे. मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचं आहे. कारण कैलासने काय पराक्रम केलं सर्वांना माहिती आहे. ओमराजे देखील कसा रक्त आटवतोय हे तुम्ही देखील पाहिलं आहे. जिथे लोकप्रतिनिधी घट्ट आहेत, तिथे शिवसैनिक घट्ट राहणारचं. ज्यांना तुम्ही खस्ता खाऊन मोठे केले, ते खोक्यात गेले, खोचक टोलाही त्यांनी बंडखोर शिंदे गटाचे नाव घेता लगावला. यावेळी शिवसैनिकांनी त्यांना खोके नको गद्दार गद्दार म्हणा अशी मागणी केली.