देशातील ६० ते ८० च्या दशकात बॉलीवूडमध्ये म्हणजे तेव्हाच्या हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्यांबरोबर नायिका म्हणून मागणी असलेल्या आणि अभिनयाच्या जोरावर स्टारडम मिळविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. आशा पारेख आता ७९ वर्षाच्या आहेत. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आज जाहीर करण्यात आला.
६०-७० च्या दशकात त्या त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या. त्या काळात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. आशा पारेख यांनी ‘मेरा गाव मेरा देश’, ‘कटी पतंग’, ‘आन मिलो सजना’, ‘तिसरी मजिल’, मै तुलसी तेरे आंगण की, काँरवा सारख्या असंख्य सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय करत हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटविला. एकेकाळी त्यांनी त्यांच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले होते. त्यांनी अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. १९५९ पासून ते १९७३ च्या काळात त्यांनी बॉलिवूडवर जादूच केली होती. त्यावेळी आशा पारेख यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते होते.
आशा पारेख यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४२ रोजी झाला. त्यांनी १९५२ ते १९५७ या काळात काही चित्रपटांमध्ये त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले. १९५९ साली दिल देके देखो या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा अभिनेत्री म्हणून ब्रेक मिळाला. त्यानंतर १९७९ सालापर्यंत त्यांनी अभिनेत्री म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा चरित्र अभिनेत्री म्हणून अनेक चित्रपटात काम केले.
आशा पारेख यांना बालपणापासून नृत्याची आवड होती. त्यांची आई सुधा पारेख यांनी आशा यांना नृत्य शिकण्यासाठी शिकवणीही लावली होती. एकदा एका कार्यक्रमात दिग्दर्शक बिमल रॉय यांनी आशा यांचे नृत्य पाहिले. त्यावेळी आशा यांचे वय दहा वर्ष होते. आशा यांचे नृत्य पाहून दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मां’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी ‘बाप बेटी’ या चित्रपटासह ९५ हून अधिक चित्रपटात काम केले. राजेश खन्ना, मनोज कुमार, सुनील दत्त आणि धर्मेंद्र यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत आशा पारेख यांनी स्क्रिन शेअर केली.
आशा पारेख आणि राजेश खन्ना यांची जोडी पडद्यावर सुपरहिट म्हणून ओळखली जायची. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘कटी पतंग’ या चित्रपटासाठी आशा पारेख यांना सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तसेच १९९२ मध्ये त्यांच्या अभिनयामधील योगदानासाठी भारत सरकारने आशा पारेख यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवही केला होता.