राज्य मंत्रिमंडळाने रेशनकार्ड धारकांना दिवाळीसाठी १०० रुपयामध्ये रेशन दुकानातून एक किलो चणाडाळ, साखर, रवा व एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारची ही दिवाळी भेट अत्यंत तुटपुंजी आहे. सरकारने महागाईचा विचार करून प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यातच तीन हजार रुपये दिवाळी भेट जमा करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणतात की, राज्यातील जनतेची दिवाळी गोड करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. विशेषतः महागाई प्रचंड वाढलेली आहे, जीवनावश्यक वस्तूसह किराणा माल घेणेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे अशा परिस्थीतीत ज्या चार वस्तू १०० रुपयात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्या एका कुटुंबासाठी अपुऱ्या व अत्यंत तुटपुंज्या आहेत. राज्यातील जनतेची दिवाळी गोड व्हावी असे आपणास वाटत असेल तर अतिसंवेदनशील मुख्यमंत्री या नात्याने तीन हजार रुपये रेशनकार्डधारकांच्या थेट बँक खात्यात जमा करून सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड करावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला खुष करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिवाळी भेट जाहिर केली. या दिवाळी भेटीअंतर्गत एक किलो चणा डाळ, रवा, साखर आणि पामतेल या वस्तू १०० रूपयात देण्याचा निर्णय घेतला. यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवित १०० रूपयांऐवजी तीन हजार रूपये जनतेच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे…