राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असे भाजपाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर भाजपाची पहिलीच प्रदेश कार्यकारणीची बैठक पनवेल येथे पार पडली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हणाले की, त्यांचे आणि राष्ट्रवादीचे आधीच ठरले होते. मी त्यांना फोन करत होतो पण ते फोन घेतच नव्हते असा दावा केला.
तसेच हल्ली रोज सकाळी वाजणारा लाऊडस्पीकर फारसा वाजत नाही. मला माहित नाही का वाजत नाही ते असा खोचक टोलाही संजय राऊत यांचे नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
फडणवीसांच्या याच दाव्यावर आणि टोल्यावर शिवसेना खासदार संजय रांऊत यांनी प्रतिक्रिया दिली. असत्याला सत्याचा मुलामा देऊन कितीही गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला, तरी सत्य हे सत्य असते. आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत, असा खोचक टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला.
हा खोटारडेपणाचा कळस आहे. माणूस किती बेमालूमपणे खोटू बोलू शकतो. असत्याला सत्याचा मुलामा देऊन कितीही गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्य असते. त्यामुळे भंपक गोष्टीकडे लक्ष देऊ नको. मराठी माणूस आज अस्वस्थ आहे. उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही आम्हाला सत्य आणि न्यायाच्या गोष्टी सांगू नका असा पलटवारही त्यांनी केला.
तुम्ही केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून कितीही कारवाई करा कोणतीही कारवाई करा मी त्या सर्व गोष्टींचा सामना करायला तयार आहे असे आव्हान देत पण तुम्ही आमचा लाऊडस्पीकर बंद करू शकत नाही. प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक महिला ही लाऊ़डस्पीकर असल्याचे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांचे मी धन्यवाद मानतो, ते जरी पुण्याला गेलेले असले तरी त्यांनी कोल्हापूरचे पाणी दाखवून दिलेच. भाजपामध्ये तसेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. तेथे कोणालाही फारसे बोलण्याची संधी नाही. मात्र चंद्रकांत पाटील यांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीवरून जी पक्षांतर्गत असलेली खदखद व्यक्त केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेला कितीही नेस्तानाभूत करा पण शिवसेना अशी संपणार नाही. दिल्लीश्वरांच्या सांगण्यावरून बाळासाहेबांची शिवसेना संपवायचा कितीही प्रयत्न केला तरी ती संपणार नाही असेही ते म्हणाले.