शिवचरित्र लिहीण्यावरून आणि त्यातील एकांगी लेखनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवशाहिर बाबासाहेब म. पुरंदरे यांच्यावर टीकेची झोड उठवित धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नसल्याचे वक्तव्य केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी पवार बोलत होते.
काल शनिवारी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. पवार यांच्या या टीकेनंतर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी थेट सवाल करत नेमके शरद पवार कोणते? १९७४ सालचे की काल ज्यांनी टीका केली ते खरे असा उपरोधिक सवाल केला.
जेम्स लेन पुस्तकातील मजकूरावरून बाबासाहेब पुरंदरे यांनी ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीला पत्र लिहिले होते. त्यानंतर ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीने माफीही मागितली. तरीही शरद पवार हे सातत्याने पुरंदरे यांच्यावर टीका करत आहेत. शरद पवार आणि पुरंदरे यांच्या दरम्यानचा एक जुना पत्र व्यवहार नुकताच हाती लागला आहे. यामध्ये शरद पवार यांनी शिवशाहीर पुरंदरे यांचे कौतुक केले असून तेच खरे शिवशाहीर आहेत, त्यांचे काम चांगले आहे त्यांच्या कार्याला माझा पाठिंबा असल्याचे लिहिले आहे. हे पत्र १९७४ साली शरद पवार यांनी पुरंदरे यांना लिहिलेले आहे. मग त्यावेळी तेच एकमेव शिवभक्त असल्याचे वाटत होते. मग आताच त्यांच्यावर टीका का? असा सवालही त्यांनी केला.
या सगळ्या गोष्टी पाह्यल्यावर एकच विचारावे वाटते की, नेमके शरद पवार कधीचे? १९७४ सालचे की काल ज्यांनी टीका केली ते खरे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले. यासंदर्भात दवे यांनी काल शनिवारीच एक व्हिडिओही व्हायरल केला होता असेही त्यांनी सांगितले.
यानंतर आम्ही शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुक करतानाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला होता. दरम्यान, आम्हाला आज शरद पवार यांचा १९७४ सालचा पत्रव्यवहार सापडला आहे. त्यावेळी मुंबईतील तत्कालीन शिवसृष्टी पाहिल्यानंतर शरद पवार यांनी लेखी स्वरुपात बाबासाहेब पुरंदरे यांचं प्रचंड कौतुक केलं होतं. त्या पत्रात शरद पवारांना बाबासाहेब पुरंदरे हे शिवअभ्यासक, शिवचरित्रकार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त वाटत आहेत. मात्र, काल त्यांना बाबासाहेब पुरंदरे हे शिवाजी महाराजांवर अन्याय करणारे दिसले. त्यामुळे आम्हालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की शरद पवार नेमके कोणते आहेत? १९७४ साली कौतुक करणारे की कालचे टीका करणारे? शरद पवार यांनी पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे असो वा समर्थ रामदास स्वामी असो यांच्याविषयीची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही दवे यांनी केली.