शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे? यावरून सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रिय निवडणूक आयोगासमोर उध्दव ठाकरे गट आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय हाती येण्यापूर्वीच केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले. त्यातच समता पार्टीच्या एका कार्यकर्त्याने पुन्हा एकदा मशाल या चिन्हाबाबत दावा केल्यानंतर हे चिन्ह ही ठाकरे गटाकडून काढून घेण्यात येणार असल्याची शक्यता उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यानंतर ठाकरे गटाकडूनही पक्षाच्या नावासाठी आणि चिन्हासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती पुढे येत आहे.
संजय राऊत हे नुकतेच कोकण दौऱ्यावरून परतले आहेत. माघारी आल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी नवीन निवडणूक चिन्हाबाबत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं आहे. ठाकरे गटाला सध्या निवडणूक आयोगानं’मशाल’ हे पक्षचिन्ह दिलं आहे. पण हे चिन्ह समता पक्षाचं आहे, त्यामुळे समता पक्षाने या चिन्हावर आक्षेप घेतला आहे.
अंधेरी, कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट ‘मशाल’ चिन्ह वापरू शकतात. मात्र, त्यानंतर कदाचित ‘मशाल’ हे चिन्हही काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून नवीन पक्षचिन्ह मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, मी आता कोकणच्या दौऱ्यावरून परत आलो आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाची चोरी झाली आहे. हे चोर कोण आहेत? याचा तपास आम्ही घेत आहोत. अलीकडच्या काळात मंदिरावर दरोडे पडतायत, मंदिरांचे सोन्याचे कळस चोरीला जातायत, मूर्तींच्या चोरी होतायत. अगदी याचप्रमाणे आमच्या मंदिरातील शिवसेनाप्रमुखांचं धनुष्यबाण चोरीला गेलं आहे. या चोरीसाठी दिल्लीतील एखाद्या महाशक्तीनं काय मदत केली? याचा तपास आम्ही करतोय. पण लोकांना आम्ही सांगू इच्छितो की, धनुष्यबाणाची चोरी झाली असून संशयित चोर कोण आहेत? याची माहिती लवकरच जनतेसमोर आणू असा गर्भित इशाराही दिला.