महाविकास आघाडी सरकारच्या काळात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना नेते सध्या शिंदे गटातील संजय राठोड यांना शिंदे गटाकडून पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात मंत्री करण्यात आले असून यवतमाळ जिल्ह्याचे पालक मंत्रीही करण्यात आहे. सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगला आहे. मात्र, जनतेची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळत आहे. त्यामुळे, शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येते.
मंत्री संजय राठोड म्हणाले, वाशिम मधील जनतेला माझ्यामागे अनेकजण हात धुवून लागले आहेत, तुम्ही मला मदत करा, अशा प्रकारची विनंती त्यांनी लोकांपुढे केल्याची बाब समोर आली आहे.
वाशिम जिल्हा दौऱ्यावर असता मानोरा तालुक्यातील असोला येथे नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना संजय राठोड म्हणाले की, मी यवतमाळ मध्ये २५ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णांसाठी मदतीचे काम करत आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही मला मदत करा, तुम्ही जरी मला मतदान करत नाहीत, पण तुमचे नातेवाईक हे माझ्या मतदारसंघात राहतात, त्यांना तुम्ही नेहमी सांगता. तेव्हा येणाऱ्या निवडणुकीत मला निवडून आणण्यासाठी अशीच मदत करा, अशी विनंतीच जनतेला राठोड यांनी केली आहे. विशेष म्हणजे, अनेकजण माझ्यामागे हात धुवून लागले आहेत,असेही त्यांनी म्हटले आहे.
बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी काही दिवसापुर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी महंत यांनी एकप्रकारे मंत्री संजय राठोड यांना आव्हानच दिले आहे. तर, मुळ शिवसैनिकांचंही त्यांना यंदा आव्हान राहणार आहे. त्यामुळे, मंत्री राठोड यांची विनंती किती लोकं ऐकतील हे पाहण्यासाठी आगामी निवडणुकासाठी दोन वर्षाचा कालावधी वाट पहावी लागणार आहे.