शिवसेनेने पहिल्यांदा तिकीट देत धैर्यशील माने यांना निवडूण आणले. मात्र त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने हातकणगंले येथील शिवसैनिकांनी खासदार धैयर्शील माने यांच्या घरावर मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. या मोर्चाचा धागा पकडत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले की, खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा संतप्त सवाल करत तुमच्या भावना भडकवल्या जात आहे, याचा तुम्ही विचार करावा, असेही आवाहनही यावेळी शिवसैनिकांना केले.
यावेळी दिपक केसरकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लक्ष्य करत काही प्रश्न विचारले असून ते म्हणाले की, आमच्या खासदारांच्या घरावर शिवसैनिक मोर्चे निघत आहेत. त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा अधिकार शिवसैनिकांना कोणी दिला? असे मोर्चे काढणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज तुमच्या भावना भडकावल्या जात आहे, त्याचा विचार करा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
एकनाथ शिंदेनी मला मुख्यमंत्री पद नको, मात्र तुम्ही भाजपासोबत युती करा, अशी विनंती केली होती, हे खरे का? असा सवाल केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना करत म्हणाले, खासदार राहुल शेवाळेंनी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात युतीची बोलणी सुरू होती. मात्र, १२ आमदारांचे निलंबन केल्याने ही चर्चा फिसकटली, हे खरं आहे का? एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. मात्र, ते स्वत: तुमच्याकडे येऊन आम्हाला हिंदुत्त्व सोबत जायचं आहे, असं म्हणाले होते. तेव्हा तुम्ही हिंदुत्त्वाबरोबर का गेला नाही, हे देखील उद्धव ठाकरेंनी सांगावं असे आव्हानही त्यांनी दिले.
विशेष म्हणजे यावेळी आदित्य ठाकरे यांच्याबाबत विचारले असता केसरकर म्हणाले, ते आमचे आदरणीय नेते आहेत. त्यांचा आजही मी आदर करतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण युवासेनेचे प्रमुख आज मुंबईत फिरत आहेत. अनेक शाखांना भेटी देत आहेत. मात्र, कालपर्यंत हे मुंबईतही दिसत नव्हते असा उपरोधिक टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
मात्र संजय राऊत यांच्याकडून नव्याने सुरु करण्यात आलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रवक्त्याच्या स्वभावात सुधारणा होती. मात्र, ती पुन्हा बिघडत चालला आहे. २०१४ साली राज्यात भाजपासोबत सत्तेत असताना, रोज सकाळी कोणतरी पत्रकार परिषद घ्यायंच आणि केंद्र सरकारवर टीका करायचे, हे योग्य नव्हतं. तुम्ही ज्या पक्षासोबत सत्तेत आहात निदान त्यांच्याशी तरी संबंध चांगले ठेवायचे.