शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले. मात्र सुरुवातीला बंडखोरीनंतर ४० आमदारांनी ठाकरे कुटुंबिय आणि मातोश्रीवर भाष्य करायचे नाही असा निर्णय घेतला. मात्र मध्यंतरीच्या काळात दिपक केसरकर यांच्यासह अनेक बंडखोर आमदारांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका करण्यास सुरुवात केली. मात्र आज अचानक बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठवित सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
विशेष म्हणजे दिपक केसरकर यांनी त्यासाठी खास पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या.
जेव्हा अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण घडले तेव्हा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यावेळी पत्रकार परिषदा घेतल्या. आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यामागे या पत्रकार परिषदांचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबियांवर जे प्रेम करतात ते यामुळे दुखावले होते. मी देखील माझी नाराजी भाजपा नेत्यांना सांगितली होती. अशा गोष्टींसाठी तुम्ही तुमचा मंच कसा वापरू देता असे त्यांना विचारले होते. तेव्हा आमच्या बहुतांश आमदारांचा अशा तऱ्हेच्या बदनामीला विरोध आहे, असे त्यांनी सांगितले होते असेही त्यांनी सांगितले.
एखाद्या तरुणाला मोठे राजकीय भवितव्य असताना अशी बदनामी केली जात असेल तर ते योग्य नसते, हे मी समजू शकतो. जेव्हा आपल्या कुटुंबातील माणसाची बदनमी होते तेव्हा किती वेदना होतात. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला. वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली. सुशांतसिंह प्रकरण जेव्हा घडले होते, तेव्हा नारायण राणे यांची पत्रकार परिषद मुंबईमध्ये भाजपा कार्यालयात झाली होती. आदित्य ठाकरे यांच्या बदनामीमुळे अनेक लोक नाराज झाले होते. अनेकांनी मोर्चे काढले होते अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही, असे केसरकर याआधीही म्हणाले होते. तसेच किरीट सोमय्या मातोश्रीवर बोलण्याचे टाळू शकतात तर राणे यांना काय कठीण नाही असेही ते म्हणाले.