काँग्रेसचा परंपरागत लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा सांगली लोकसभा मतदारसंघावर अचानक शिवसेना उबाठा गटाने दावा करत त्या जागेवर महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारीही जाहिर केली. मात्र काँग्रेसचे संभावित उमेदवार विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी सांगलीचा मतदारसंघावर शिवसेना उबाठा गटाने परस्पर दावा करत उमेदवार दिल्याने काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यात तू तू मै मै सुरु झाले आहे.
वास्तविक पाहता सांगली हा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून राहिला आहे. यापूर्वी काँग्रेसचे नेते वसंतदादा पाटील आणि त्यांच्यानंतर त्यांचे नातू, मुलगे आदींनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या चर्चे दरम्यान सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहिर केली. तर त्यानंतर शिवसेना उबाठा गटाने या उमेदवारालाच पळवून आणत शिवसेना उबाठा गटाच्या वतीने उमेदवारी जाहिर केली. तरीही काँग्रेसने या लोकसभा मतदारसंघावरील हक्क सोडला नाही. दरम्यान शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला सुरुवातही केली.
यावरून संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, यापूर्वीच काँग्रेसला सांगून हा मतदारसंघ आम्ही घेतला आहे. मात्र स्थानिक नेत्यांनी यात कारण नसताना लुडबुड करू नये असे सांगत अप्रत्यक्ष विश्वसजीत कदम यांच्यावर टीका करत नाराजांच विमान कुठं उतरत ते माहीत आहे असा खोचक टोला लगावत ते विमान गुतराजमध्ये जाऊ नये अशी टीकाही केली.
त्यावर विश्वजीत कदम म्हणाले की, मला माहित नाही की संजय राऊत हे कोणाबद्दल बोलत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावे, पण महाविकास आघाडीवर परिणाम होईल असे वक्तव्य करणे टाळावे. सांगलीत कोणालाही विचारले कोणीही सांगेल की सांगली हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा आहे. इतकचं काय इथल्या जनावरांना अर्थात शेतकऱ्यांच्या जनावरांनाही विचारलं तरी ती जनावरही सांगतील असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
यासंदर्भात पुढे बोलताना विश्वजीत कदम म्हणाले की, यासंदर्भात मुकुल वासनिक आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या कानी ही गोष्ट घातली आहे. त्यांनी आश्वासन दिले आहे की, पुढील एक दोन दिवसात यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ. त्यामुळे सांगली मतदारसंघावर काँग्रेसचा हक्क अबाधित आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत दिल्ली दराबाराहून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहतो की शिवसेना उबाठा गटाकडे जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.