मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांनी माझ्यावर केलेले आरोप हे पुर्णत: निराधार आहेत. माझ्या मतदारसंघातील माझे विरोधक हेमंत देशमुख यांच्या माहिती व सांगण्यावरुन माझ्यावर तथ्यहीन आरोप करण्यात येत असल्याचा खुलासा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी एका लेखी निवेदनाच्या माध्यमातून केला.
तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीशी माझा कोणताही संबंध नाही. या कंपनीशी व्यक्तिश: माझा भूतकाळात आणि वर्तमानातदेखील तिळमात्रही संबंध नव्हता आणि नाही. मी या कंपनीत ना कधी संचालक होतो वा आहे, ना कधी भागधारक होतो वा आहे. तसेच या रिसॉर्टसंदर्भात माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणतीही क्रिया – प्रक्रिया झालेली नाही. तरीही या संदर्भात माझ्यावर आरोप करण्यात आले असून ते पूर्णत: तथ्यहीन आणि खोटे आहेत. विरोधकांनी आरोप करताना ते पुरावे व कागदपत्रांनिशी करावेत असे आव्हानही त्यांनी नवाब मलिक यांना दिले.
यासंदर्भात माहिती घेतली असता, साधारण १९५७-६० च्या काळात तोरणमाळ येथे कुडाच्या झोपड्याच होत्या. १९९० – ९१ च्या काळात एमटीडीसीने रितसर प्रकिया करुन तोरणमाळ रिसॉर्ट हे तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीस भाडेतत्वावर चालविण्यास दिले व बरीच वर्षे त्यांनी नियमीतपणे भाडेदेखील भरले. तेव्हा मी शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थी होतो. जे. जे. रावल हे त्यावेळी या भागीदार कंपनीचे संचालक होते. तथापी, सन २००० मध्ये त्यांनीही या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या कंपनीच्या कामकाजाशी तब्बल १८ वर्षांपासून त्यांचाही काही संबंध राहीला नाही. तसेच रावल परिवाराचा कुणीही सदस्य या कंपनीचा संचालक नाही. सन २००० पासून श्री. राजेश रेशमवाला हे ही कंपनी चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्यावर आरोप करणारे हेमंत देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे असून
द्वारकाधीश उपसा जलसिंचन योजना, विखरण, धुळे जिल्हा सहकारी बँक, शिंदखेडा सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आदी विविध प्रकरणांमध्ये घोटाळ्याच्या केसेस सुरु आहेत. त्यांच्याविरोधात एसीबीच्या दोन चौकशा सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सध्या माझे मतदारसंघात तसेच मंत्री म्हणून राज्य स्तरावर चांगले कामकाज सुरु आहे. विविध लोकोपयोगी योजना व कामांमुळे माझ्या मतदारसंघातील शिंदखेडा व दोंडाईचा नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी – विक्री संघ या संस्थांमधील विरोधकांचे अस्तित्व संपुष्ठात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वत:चे अस्तित्व राखण्यासाठी विरोधक माझी प्रतिमा मलिन करुन राजकीय फायदा उठविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याच गैरहेतूने माझ्यावर हे आरोप करण्यात आले असून विरोधकांमध्ये धमक असल्यास त्यांनी वैधानिक मार्ग अवलंबावा, असे आव्हानही विरोधकांना त्यांनी दिले.