Breaking News

पंतप्रधान गृहनिर्माण योजनेतील घरांसाठी पाच ब्रास वाळू मोफत

लोकसंवाद कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधान गृहनिर्माण योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केली.

 शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजपासून ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांशी संवाद सुरू केला. या कार्याक्रमाच्या पहिल्या भागात आज राज्यातील पंतप्रधान गृहनिर्माण योजना, रमाई गृहनिर्माण, शबरी घरकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या चांदा ते बांदापर्यंतच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला.

पंतप्रधान गृहनिर्माण योजना, रमाई गृहनिर्माण योजना, शबरी घरकुल योजनेचा लाभ घेताना कोणत्या अडचणी आल्या, अनुदान वेळेत मिळाले का, शौचालयाचे बांधकाम केले का, अनेक प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष लाभार्थ्यांकडून जाणून घेतली. यावेळी, अनुदान थेट बँकेतून मिळत असल्यामुळे राज्य शासनाच्या योजना जलदगतीने सर्वसामान्यांपर्यंत पोचले असल्याच्या व त्या पारदर्शकपणे राबवित असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.

वर्धा येथील आरती कोट्टेवार व गडचिरोली जिल्ह्यातील फुलेवाडा येथील जावेद शेख यांनी पंतप्रधान गृहनिर्माण योजनेतून घर बांधताना रेती मिळण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेतील घरांच्या बांधकामासाठी पाच ब्रासपर्यंत रेती मोफत देण्याची घोषणा केली. तसेच यासंबंधी सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना सूचना देण्यात येणार असल्याचेही सांगितले.

या योजनेतील घरांच्या आराखड्यासाठी घेण्यात येणारे शुल्क माफ करण्यासंदर्भात केंद्र शासनाशी चर्चा सुरू असून लवकरच त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे अमरावतीतील आशा जामजोड यांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनाचा लाभ मिळालेल्या वर्धा जिल्ह्यातील सुनंदा चौधरी यांनी या योजनेमुळे जागा मिळाली आणि पंतप्रधान गृहनिर्माम योजनेमुळे घराचे बांधकाम झाल्याचे सांगितले. तर वर्ध्यातीलच सविता श्रीशैल गायकवाड या घरकाम करणाऱ्या महिलेने या योजनेमुळे आपलं घर झाल्याचे सांगून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 

नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील लहान या गावातील अस्मिता राजेश वाहेवळ म्हणाल्या, कुडाचे घर असल्यामुळे इतर पाहुण्यांचे पक्के घर पाहून मुले वारंवार आपले घर चांगले का नाही, असा प्रश्न विचारत होती. घर नसल्यामुळे चांगले घर व्हावे, यासाठी मुले जोमाने अभ्यासाला लागली. त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेमुळे घर मंजूर झाले आणि यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदाच थेट संवाद साधता आला असल्याची भावना व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यातील सुजाता दिगंबर सावंत यांनी रमाई आवास योजनेतून घर मिळाल्यामुळे मुले आनंदी असून ते आपल्या मित्रमैत्रिणींना घरी आवर्जून आणत असल्याचे सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील दहिवलीचे कैलास धुळे, लातूरमधील बाबूराव साधू कांबळे, नागपूर जिल्ह्यातील खैरी पिंजेवाड येथील दर्शना सोलंकी, नाशिकमधील नंदा पाडेकर या लाभार्थ्यांशी त्यांच्या नव्या घराच्या ठिकाणी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला व घराच्या सुंदर बांधकामाबद्दल लाभार्थ्यांचे कौतुक केले. या लाभार्थ्यांनी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विष्णू राऊत यांनी राज्य व केंद्र शासनामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याच्या भावना व्यक्त करून आपल्या नव्या घरात भेट देण्याचे थेट निमंत्रणच मुख्यमंत्र्यांना दिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णात पांडुरंग निकम यांनी सांगितले, पक्के घर बांधल्यामुळे आनंद झाला असून माझ्या मित्रांनी घरावर लावलेल्या कृ.पा. निकम या नावाच्या पाटीवर बदल करून ‘देवेंद्र – मोदीजी कृ पा’ असा बोर्ड लावला असल्याचे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सन २०२२ मध्ये सारा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रत्येक बेघर कुटुंबाकडे आपला हक्काचा निवारा असावा, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यासाठी या कार्यक्रमाला त्यांनी गती दिली आहे. देशातील लाखो कुटुंबे स्वत:च्या घराचे स्वप्न पाहत आहेत. त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या चार वर्षात देशात सव्वा कोटी घरांची निर्मिती करण्यात आली आहे. या घरांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात भरीव वाढ करण्यात आल्याने आता तुलनेने मोठ्या आकाराची आणि सोईसुविधायुक्त घरे दिली जाणार आहेत. बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

आधुनिक माध्यमाद्वारे एकाच वेळी राज्यातील सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले. लाभार्थ्यांशी संवादाचे थेट प्रक्षेपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या devendra.fadnavis या फेसबुक पेजवर, @Dev_Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर आणि DevendraFadnavis या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेज आणि youtube.com/maharashtradgipr यूट्यूब चॅनलवरून आणि पार्थ इन्फोटेकच्या http://elearning.parthinfotech.in/या लिंकवरून करण्यात आले होते.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *