मुंबई : प्रतिनिधी
पारंपारीक दिवाळी सण पुढच्या आठवड्यापासून सुरु होत असून या सणामध्ये जनतेने एकत्रित येवून हा सण साजरा करण्याचे टाळावे असे आवाहन करत फटाके विरहीत सण साजरा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तसेच दिवाळीच्या कार्यकाळात पहाट गाणी सारखे कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहनही राज्य सरकारने नुकतेच एका निर्देशाद्वारे सर्वांना दिले.
राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावली खालील प्रमाणे
कोरोना कालावधी असल्याने जनतेने साध्या पध्दतीने दिपावली सण साजरा करावा.
मंदिरांना अद्याप परवानगी दिलेली नसल्याने दिपावली सण घरगुती पध्दतीने साजरा करा. वयस्कर व्यक्ती, लहान मुले यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये असे आवाहन करत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी गर्दी करू नये-मास्कचा वापर करावा-सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन सरकारकडून केले.
कोरोना आजारपणामुळे फटाक्यांच्या आवाजाचा आणि त्यातील वायुमुळे निर्माण होणाऱ्या प्रदुषणाचा थेट परिणाम होवून त्रास होण्याचा धोका आहे. त्यामुळे फटाक्याचा वापर टाळण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून दिवाळी सण साजरा करावा.
या कालावधीत कोणताही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये असे आवाहन करत जर करायचे असेल तर त्याचे प्रसारण ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक माध्यमातून त्याचे प्रसारण करावे.
सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी रक्तदान शिबीरासारखे कार्यक्रम आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे आणि त्याद्वारे डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजाराबाबत जनजागृती करावी.