राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी
मोदी सरकार कॅगचा उपयोग स्वतःला क्लिनचिट देण्यासाठी करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत कॅग अहवालाबाबत आणि सरकारच्या या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला.
आतापर्यंत कॅगचे अनेक रिपोर्ट बघितले आहेत. मी पहिल्यांदाच कॅगच्या रिपोर्टमध्ये एखाद्या विभागाचे कौतुक करताना पाहिले आहे. कॅगचे काम असते की, सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेणे व त्यात काही आक्षेपार्ह असेल, भ्रष्टाचार असेल तर ते समोर आणणे. आजपर्यंत कॅगने चांगले काम झाल्याचे सांगितले नसल्याचे ते म्हणाले.
राफेलमध्ये घोटाळा झाला नसेल तर तो कॅगमध्ये मांडण्याची गरज काय ? असा सवाल करतानाच कॅग एखाद्या मंत्र्यांचं किंवा खात्याचं कौतुक केले आहे. आजपर्यंत असे कधीच घडलेच नाही. मोदी सरकार सर्व स्वायत्त यंत्रणेचा उपयोग करून घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.