मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी विना औषध उपचार आणि पाणी न घेता उपोषणाला सुरुवात केली. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशीच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळायला सुरुवात झाली असून आता जरांगे पाटील यांना फार काळ बसवत नाही की हातात माईक धरल्यानंतर हात ही थरथरताना दिसून येत आहे.
तरीही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा देत ३० आणि ३१ तारखेनंतर मराठा समाज आपले आंदोलन दाखवेल असे सांगत जोपर्यंत बोलायला येत तोपर्यंतच चर्चेला या अशी मागणी राज्य सरकारकडे करत नंतर काहीही उपयोग नाही असा निर्वाणीचा इशाराही सरकारला दिला.
तसेच मनोज जरांगे पाटील म्हणाले की, चर्चेला आलात तर मराठे तुम्हाला आडवणार नाहीत. त्यामुळे चर्चेला या अन्यथा मराठे काय आहेत हे दाखवून देतील असा इशाराही दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर पाणी सुध्दा न घेता आमरण उपोषण सुरु केले. तसेच राज्यातील सर्व राजकिय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे आवाहन सर्व मराठा समाजाला केले. त्यानंतर राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली. त्याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार ते शंभूराज देसाई या सर्वांना बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी तातडीने मंत्रालयात बैठक बोलविण्यात आल्याचे काल शनिवारी २८ ऑक्टोंबर रोजी जाहिर केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चर्चेला यावं असे आवाहन केले. त्याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फडणवीस यांनी काल काय कानात बोळे घातले होते का? असा खोचक सवाल करत मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने चर्चेला यावं असे कालच जाहिर केलं होते. तसेच काल दिवसभर सरकारच्या निर्णयाची वाट पहात होता असे क्षीण आवाजात प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.
तसेच भाजपा पुरस्कृत माजी खासदार संभाजी महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घ्यावं औषध उपचार घ्यावेत असं त्यांच्याशी फोनवर बोलताना सल्ला दिला. तसेच आपलं आमरण उपोषण पुढे सुरुच ठेवावं अशी सूचना केली. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी पाणी आणि औषधोपचार घेण्यास असमर्थता दर्शविली. तसेच आपलं उपोषण असंच सुरु राहणार असल्याचं संभाजी महाराज यांना कळविले.