मराठा आरक्षण प्रश्नी आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावित चर्चा करण्यात आली. त्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने ठोस निर्णय न झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले. त्यानंतर राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आमदारांची घरे जाळण्याचे प्रकार करण्यात आले. तर काही आमदारांच्या घरांची तोडफोड करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाने आतापर्यंत शांततेत आंदोलन केले. मात्र आज काही भागांमध्ये हिंसक आंदोलन करण्याच्या घटना घडल्याचे कानी येत आहे. तसेच हे आंदोलक सत्ताधारी व्यक्तींकडची असल्याचेही कळत आहे. सर्वसामान्य मराठा अशा पध्दतीची आंदोलने करू शकत नाही असेही स्पष्ट केले.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझे आमरण उपोषणाचे आंदोलन असेच सुरु राहणार आहे. माझ्यासाठी समाजच मायबाप आहे. माझे आंदोलन सुरु रहावे असे वाटत असेल आंदोलकांनी मला त्रास होणाऱ्या गोष्टी करू नयेत असे सांगत अशा गोष्टींमुळे मी आंदोलन करत असलो तरी मला त्याचा त्रास होतो असेही स्पष्ट केले.
हिंसक आंदोलनाबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जाळपोळीची आंदोलने करणारे हे सर्वसामान्य गरीब मराठे असूच शकणार नाहीत. त्यामुळे ही माणसे सत्ताधाऱ्यांचीच असणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाळपोळीचे आंदोलने करणाऱ्यांना आवरावे असे सांगत अशा पध्दतीची आंदोलने जर थांबवली नाहीत तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही दिला.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, समाजाच्या आग्रहास्तव मी पाणी प्यायला सुरुवात केली आहे. तसेच मराठा समाजाच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकर यांनीही पाणी पिण्यासंदर्भात मला पत्र पाठविले आहे. त्यामुळे मी पाणीही पिणार असल्याचे जाहिर केले.