मुंबई : प्रतिनिधी
जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करुन जी कामे करण्यात आली ती निकृष्ट दर्जाची झाली असून या जलयुक्त शिवार योजनेचे संपूर्ण ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना केली.
ही जलयुक्त शिवार योजना भाजपच्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आणण्यात आली असा आरोप करतानाच बीडमध्ये इतक्या खालच्या दर्जाचे काम करण्यात आले आहे की,लहान लहान बंधारे टिकत नाहीत.काठयांनीसुध्दा सिमेंट निघते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या जलयुक्त शिवार योजनेचे संपूर्ण ऑडिट झाले पाहिजे.शिवाय कामाची तपासणी झाली पाहिजे अशी मागणी केली.
या योजनेचा नुसता प्रचार करुन करोडो रुपये भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाटलेले आहे हे या निकृष्ट कामावरुन सिध्द झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
UY कंपनीचा परवाना रद्द करुन उच्चस्तरीय चौकशी करा
घाटकोपरमध्ये काल झालेल्या विमान दुर्घटनेनंतर UY कंपनीचा परवाना रद्द करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना केली.
घाटकोपरमध्ये UY कंपनीचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. या कंपनीचा अनुभव फक्त चार वर्षाचा आहे. या कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी विमानसेवा देण्याचा ठेका दिला होता. त्यानंतर दोनदा मुख्यमंत्री विमान अपघातातून वाचले. नंतर याच कंपनीचे विमान काल कोसळले आहे.
उत्तरप्रदेशचे भंगार खरेदी करुन एखादी विमानसेवा कोण चालवत असेल तर हा विषय गंभीर आहे. या अगोदरच्या अपघाताची चौकशी का झाली नाही असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.