मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पसरला आहे. महिनाभरातील ही तिसरी घटना असून ही घटना नेमकी का घडली याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
हर्षल रावते या ४५ वर्षीय तरूणाने मंत्रालयातील पाजव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कळताच मंत्रालयात पाहणी करण्यासाठी आले होते. या सर्व प्रकरणाची पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील आदी होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील मागणी केली.
तर मंत्रालयाकडे जनता न्याय मिळेल या आशेने पाहत असते, पण जनतेला न्याय मिळत नाही. अशा घटना वारंवार घडणे हे सरकार साठी भूषणावह नाही नसल्याचे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी व्यक्त केले.
दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे ही मंत्रालयात येवून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, तो युवक खुनाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या तो पँरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. त्याने आत्महत्या केली की, अपघात घडलाय याबाबत अजून काही निष्कर्ष काढता आलेला नसून पोलिस त्याचा तपास करत आहेत. त्याचबरोबर जनतेने आपल्या मागण्या घेवून मंत्रालयात यावे आणि ते काम पूर्ण करून जावे. कोणत्याही व्यक्तीच्या चूकभूलीच्या थापांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.