मागील काही दिवसांपासून म्हैसुर शेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीपू सुलतान यांच्यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर वाद रंगला आहे. त्यातच शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे फलक लावण्यावरून १५ ऑगस्ट रोजी दोन गटांत मोठा वादही झाला. या वादामध्ये एकावर चाकूहल्ला करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केला. दरम्यान, याच घटनेचा संदर्भ देत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोठे विधान केले.
शनिवारी एका जाहिर सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, टिपू सुलतान यांनी चार वेळा इंग्रजांशी लढाई केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चार वेळा इंग्रजांशी माफी मागितली,
टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात युद्ध केले होते. आपल्याला ते विसरता येणार नाही. आज टिपू सलतान यांच्याविरोधात खोटी माहिती दिली जात असल्याचे सांगितले.
टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात चार युद्ध केली. तर दुसरीकडे सावरकरांनी इंग्रजांना चार वेळा माफीचे पत्र लिहिले. आज असे काही लोक आहेत, जे टिपू सुलतान यांच्याविरोधात रोष पसवरण्याचे काम करत आहेत. टिपू सुलतान यांनी दिलेल्या योगदानाला ते मिटवू पाहात आहेत असेही ते म्हणाले.
टिपू सुलतान यांना हिंदूविरोधी म्हटले जाते. मात्र ज्या मुस्लिमांनी ब्रिटिशांची गुलामी स्वीकारली होती, त्यांचा देखील टिपू सुलतान विरोध करायचे. ज्या मराठा शासकांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, त्यांच्याविरोधातही टिपू सुलतान होते. कर्नाटकच्या नवाबने इंग्रजांविरोधात लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे टिपू सुलतान यांनी नवाबाचाही विरोध केला होता असेही त्यांनी सांगितले.