Breaking News

भाजप सरकारच्या ३० हजार तासात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची सरकारवर टीका

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला सत्तेत येवून ३० हजार तास झाल्याचा उल्लेख केला. आमच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कधीच असे तास, सेंकद, मिनिटे मोजले नाहीत. मात्र अर्थमंत्र्यांनी मोजल्याने त्यांचे काही खरे दिसत नसल्याची उपरोधिक टीका करत तुमचे सरकार आल्यापासून राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. तर दर तीस मिनिटाला १२ बलात्काराच्या आणि विनंयभंगाच्या घटना घडत असून खूनही तितक्याच प्रमाणात घडल्याचा आरोप करून या तीस हजार तासात ही अवस्था झाल्याची खरमरीत टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केली.

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील यांनी वरील मतं माडले.

तसेच प्रत्येक वर्षी एकच बजेट असतं त्यात फक्त आकडे बदलले जात आहे. काऊंटर सायकलिंगसाठी आपण काय उपाय योजना करणार आहेत ते स्पष्ट नाही. त्याचबरोबर जुलै १ पासून आपण जीएसटी आणला. त्यात मोठा गोंधळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना मोबदला देण्याचे काय झाले ? त्याबद्दल बजेटमध्ये काही लिहिलेले नाही. बजेटमध्ये उत्पन्न का कमी दाखवले ? असा सवाल करत याबाबत अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली.

राज्यातील सिंचन प्रकल्पासाठी ८७०१ कोटींची तरतूद केली होती. मात्र फक्त १ हजार कोटीच खर्च केले गेले. सरकार २०० प्रकल्प पूर्ण करायला निघाले आहे. मात्र एवढा निधी सिंचन प्रकल्पासाठी दिला गेला नाही. फक्त ८२३३ कोटीच दिले गेले. बाजूच्या राज्यांनी सिंचनासाठी भरीव तरतुद केली आहे मग आपल्या राज्यात का नाही ? असा सवाल करत सरकारला गेल्या चार वर्षात अनुशेष निर्मुलन करता आले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज्यपालांच्या अभिभाषणात मांडण्यात आलेल्या मुद्यांनुसार सरकार बँकलॉग भरून काढेल अशी अपेक्षा व्यक्त करत

सरकारने शिवाजी महाराज यांचे नावे कर्जमाफीची योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. सुधीर मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराज यांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी करत मागच्या वर्षी कृषी क्षेत्रासाठी  ३० हजार कोटी रुपये दिले गेले होते. मात्र तेवढे पैसे खर्च केले नसल्याचा आरोप करत किमान यावर्षी दिलेले ७० हजार कोटी रुपये तरी खर्च होतील का ? असा सवाल केला.

राज्य सरकारने आरोग्य खात्यासाठीचा खर्चही कमी केला आहे. केंद्र सरकारने २ हजार कोटीचा निधी दिला आहे. केंद्र सरकारने जे बजेट सादर केले त्या बजेटमध्ये महत्त्वाची नँशनल हेल्थ स्कीम आहे. त्या स्कीमची राज्य सरकारने आपल्या बजेटमध्ये नोंद घेतली नाही. बजेटमध्ये साधा उल्लेख नाही. हे का ? तोही जुमला आहे हे राज्य सरकारला माहिती आहे का ? अशी फिरकीही त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांची घेतली.

राज्याच्या अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टोपी घातली बजेटमध्ये १३ हजार कोटी दिले आहे असे सांगितले पण ७ वा वेतन आयोग सरकारचे मोठे आव्हान आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना यांनी गाजर दाखवल्याचा आरोप करून ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक जगात सर्वात उंच व्हायला हवे अशी आमची भावना आहे. महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी. तसं झालं तर महाराष्ट्र माफ करणार नसल्याचा पुन:रूच्चार करत बजेटमध्ये बाळासाहेब, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला निधी गेला नाही. सव्वा ते दीड लाख कोटीचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबईत सुरू होईल असे सरकार म्हणत आहे मात्र ते काही शक्य नाही असे वाटत नसल्याबाबत शंका उपस्थित करत मुंगटीवार यांचे अर्थसंकल्प फसवे असल्याचा आरोपही त्यांनी शेवटी केला.

 

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *