मुंबई: प्रतिनिधी
पालघर आणि भंडारा गोंदिया मध्ये अनेक ठिकाणी मतदान यंत्रे (ईव्हीएम्स) आणि व्हीव्हीपीटीएस यंत्रे काही तांत्रिकी कारणामुळे नादुरूस्त झाली असल्याने विविध राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली. मात्र आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून कुठेही फेरमतदान घेण्यात येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले.
काही ठिकाणी मतदान यंत्रे (ईव्हीएम्स) आणि व्हीव्हीपीटीएस यंत्रे काही तांत्रिकी कारणामुळे नादुरूस्त झाली होती. नादुरुस्त यंत्रे बदलण्यात आली असून शांततापुर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. तांत्रिकी कारणांमुळे यंत्रे नादुरूस्त होण्याच्या समस्या उद्भवतात, अशी यंत्रे बदलण्यासाठी राखीव यंत्रांचीही तरतूद करण्यात आलेली असते. पालघर पेाटनिवडणुकीच्या मतदानावेळी ईव्हीएम यंत्रे नादुरूस्त झाल्यामुळे ही यंत्रे नियमाप्रमाणे बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाचे प्रसिद्धी प्रमुख शिरीष मोहोड यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
राजकीय पक्ष फेर मतदान किंवा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. मात्र, तांत्रिक बिघाड झालेल्या ठिकाणी पर्यायी यंत्र उपलब्ध करून दिले आहे . प्रत्येकाला मतदानाचा हक्क असून ह्या हक्कापासून कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही. ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार असून ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे उशिरा मतदान सुरु झालेल्या ठिकाणी वेळ दिला जाणार असून शेवटच्या मतदाराला चिट्ठी देऊन त्याला मतदान करता येणार सल्याचे त्यांनी सांगितले.