मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना विधान परिषदेवर निवडूण येण्यासाठी निवडणूक जाहीर झाली. मात्र ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने राष्ट्रवादीला राज्यसभा निवडणूकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधान परिषदेची जास्तीची एक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला. परंतु राष्ट्रवादीने त्यांच्या हिश्यातील दुसरी जागा देण्यास नकार दिल्याने अखेर काँग्रेसने नमते घेत मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी आपला ९ वा उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काँग्रेसमधील सुत्रांनी दिली.
मार्च महिन्यात विधानसभा सदस्यांकडून राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर पाठविणे शक्य होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुरुवातीला स्वत:ची उमेदवारी अर्ज भरला. मात्र दुसऱी जागा काँग्रेसबरोबर बोलणी करून पवारांनी पदरात पाडून घेत कालांतराने त्यांच्या पक्षाच्या फौजिया खान यांना उमेदवारी अर्ज भरून त्यांना राज्यसभेवर निवडूण नेले. त्यावेळी आगामी विधान परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या हिश्शाची एक जागा काँग्रेसला देण्याचे आश्वासन राष्ट्रवादीने होते असे त्यांनी सांगितले.
या बोलणीनुसार काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने सुरुवातीला राजेश राठोड यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर रात्री उशीरा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात राजकिशोर मोदी यांची उमेदवारी जाहीर केली. परंतु अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:च्या हिश्शातील जागा देण्यास काँग्रेसला नकार देत विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेले उमेदवार शशीकांत शिंदे, आणि तरूण नवा चेहरा अमोल मेटकरी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेचे दोन, काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार जाहीर झाल्याने आघाडीचा ६ वा उमेदवार धोक्यात आला. तसेच याचा थेट फटका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती अॅड.नीलम गोऱ्हे यांच्यापैकी एकाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अखेर एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माघार घेतली न गेल्याने आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे काँग्रेसने जाहीर केलेला आपाला ९ वा उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. या निवडणूकीत भाजपाकडून चार उमेदवारांची यादी जाहीर केली. त्याच्याकडील संख्याबळानुसार त्यांचे चारही उमेदवार सहजरित्या निवडूण येणार आहेत. त्यात आता काँग्रेसनेही ९ वा उमेदवार मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसने एक उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांचे आभार मानले.
दरम्यान आज झालेल्या बैठकीसाठी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, शिवसेनेकडून संजय राऊत, एकनाथ शिंदे, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
Tags ajit pawar anil parab ashok chavan balasaheb thorat cm uddhav thackeray covid-19 ekanath shinde legislative council election maharashtra milind narvekar ncp jayan patil sanjay raut
Check Also
नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही
लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …