मुंबई : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आमच्या काळात इतका चहा पित नव्हतो असे सांगत आमच्या चहा पिण्यावर टीका केली. मात्र आम्ही जे स्वत: पितो, तेच आम्ही लोकांना देतो. परंतु तुमचे राष्ट्रवादीवाले जे पितात ते आम्हीही पिवू शकत नाही आणि दुसऱ्यालाही पाजू शकत नाही. २०१४ साली तुम्ही चहा वाल्याच्या नादीला लागल्याने तुमची धुळधाण उडाली होती. त्यामुळे आता पुन्हा चहावाल्याच्या नादीला लागाल तर औषधालाही शिल्लक राहणार नसल्याचा गर्भित इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना दिला.
भाजपच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे येथील बीकेसीत आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी ४० लाख रूपये दिल्याचा आरोप केला. मात्र उंदीराना मारण्यासाठी लागणाऱ्या गोळ्यासाठी ४ लाख दिल्याचे सांगत विरोधकांना पैसे कशासाठी दिले याचेच भान राहीले नसल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
भाजपचे पाच महापुरूष झाले असून भाजपचे पहिले आद्य पुरुष डॉ.शामाप्रसाद मुखर्जी, दुसरे देवपुरूष पंडित दिनदयाल उपाध्याय, तिसरे महान पुरुष अटलबिहारी वायपेयी, चवथे लोहपुरूष लालकृष्ण अडवाणी आणि पाचवे युगपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रगती करत आहे. तसेच देशात विकासाचे वारे वहात असल्याचे सांगत आगामी निवडणूकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात आणि राज्यात आल्याशिवाय राहणार नाही.