मुंबई : प्रतिनिधी
एरवी विधिमंडळात आणि जाहीर सभांमधून सत्ताधारी – विरोधकांकडून नेहमीच एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतात. मात्र कोणत्याही नैमित्तिक कारणाशिवाय सहज भेटणाऱ्या राजकिय व्यक्तींचा एका वेगळाच चर्चेचा फड रंगल्याचे चित्र क्वचित पाह्यला मिळते. नेमके असेच चित्र नुकतेच विधान भवनात पाह्यला मिळाले.
काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा पूर्व आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे आदी विधान भवनात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी पक्षाचे नेते अजित पवार ही विधान भवनात आले. मात्र त्यांना मुख्यमंत्री फडणवीस हे विधान भवनात असल्याचे कळताच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनाकडे मोर्चा वळविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेल्यानंतर अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या फार येतात. पण प्रत्यक्षात कधी करणार आणि डिच्चू देणाऱ्यांचे काय करणार असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही अत्यंत मिश्किलपणे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असे सांगितले.
त्यावर मग डिच्चु देणाऱ्यांना काय लोकसभेची उमेदवारी देणार का? असा सवाल पवार यांनी केला.
त्यावर ज्यांना डिच्चु द्यायचाय त्यांना आधीच दिला असून अन्य जे आहेत त्यांनाही परिस्थितीनुसार लोकसभेची अन्यथा इतरची उमेदवारी देवू असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा उसळला.
या हश्शानंतर अजित पवार यांनी गुरूजींचे गुरूजी असलेल्या मंत्र्यांचे काय करणार असा खोचक सवालही त्यांनी तावडे यांच्याकडे पहात मुख्यमंत्र्यांना विचारला.
त्यावर तावडे यांनी दादा (अजित पवारांना उद्देशून) माझे नाव घेतल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही की काय? असा प्रति सवाल करत कशाला उगीच खेचताय असे सांगितले.
त्यानंतर भाजपचे काही मंत्री आणि आमदारही मुख्यमंत्र्यांच्या दालनात आल्याने हा रंगलेला गप्पाचा फड अधिकच रंगला.