Breaking News

मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला, तोंड लपवून पळणारा नाही….कृष्णेच्या का काठावर प्रायश्चित… लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता

पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहन रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर सभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जेव्हा शेतकरी पाणी मागतो त्यावेळेस हे काय म्हणतात? मी यावर फार काही बोलत नाही. परंतु अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार? अजित पवार म्हणाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची असते, रोड शो करायची काय गरज असते? हा एकनाथ शिंदे माणसातला कार्यकर्ता आहे, लोकांना भेटणारा माणूस आहे, तोंड लपवून पळणारा नाही. आम्ही लोकांना सामोरं जाणार आहोत. आम्ही असं चुकीचं काही बोलत नाही, की कृष्णेच्या काठावर जाऊन प्रायश्चित घेण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही, येणार नाही असा उपरोधिक टोला लगावला.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, असंख्य लोक आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर उभे होते, हे खरं म्हणजे दुर्लभ आणि दुर्मिळ असं चित्र या दिवशी आज पाहायला मिळालं. त्याबद्दल या संपूर्ण कसबा मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण, आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी काही कमी ठेवलं नाही. सढळ हस्ते अगदी मनापासून आमचे हेमंत रासने यांना त्यांनी आशीर्वाद दिले. सर्व वयोगटातील लोक हेमंत रासने यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. २६ तारखेला हेमंत रासने यांना मतदार भरभरून मतदान करतील आणि हेमंत रासने यांना प्रचंड मताधिक्क्याने सर्व विक्रम मोडीत काढून विजयी करतील, असं चित्र आज पाहायला मिळालं आहे.
याचबरोबर, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रॅली होती, त्यावेळीही प्रचंड गर्दी होती. मी भाग्यवान आहे एक मुख्यमंत्री म्हणून मलादेखील आशीर्वाद द्यायला एवढ्या मोठ्यासंख्येने लोक आले. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

पुणे शहरातील कसबा मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत, शेवटी हे सरकार लोकाभिमुख काम करणारं आहे. हे सरकार या ठिकाणी विकासाची गंगा आणणारं आहे. गेली ६० वर्षे जे सत्तेत होते, त्यांनी जे केलं नाही ते आम्ही करून दाखवणार. कसबा मतदारसंघातील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास असेल, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास असेल, ऐतिहासिक इमारतींचे संवर्धन, संरक्षण व टीपी स्कीम लागू करण्याचा विषय असेल हे सगळे विषय आम्ही हाती घेतले आहेत. नगरविकास विभागाला सूचना दिलेल्या आहेत. नियमात, कायद्यात बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे या शहराचा पुनर्विकास आता थांबणार नाही. रिंगरोडच्या माध्यमातून पुणे शहर वाहतुक कोंडी मुक्त होईल. मेट्रोचं काम, विमानतळाचं काम हे सगळे विकास प्रकल्प सरकारने हाती घेतले आहेत. म्हणून आमचा सरकारचा प्रतिनिधी युतीचा प्रतिनिधी हेमंत रासने याचा पाठपुरावा करेल आणि या जनतेला न्याय देईल. कसबा मतदारसंघातील सगळे प्रश्न आम्ही सोडवू असं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिलं.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *