नागपूरः प्रतिनिधी
नुकतेच जामिन सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या उपरोक्ष श्रीगोंदा येथील पोलिस उपनिरिक्षक महावीर जाधव यांनी शिवीगाळ केली. लोकप्रतिनिधींना अशा पध्दतीने शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना माज आलाय का? कशामुळे शिवीगाळ करतोय असा सवाल करत माज आलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळ यांना पोलिस उपनिरिक्षक महावीर जाधव यांनी कारण नसताना शिवीगाळ केल्याच्या संदर्भात विशेष हक्काभंगाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. यावेळी आव्हाड बोलताना म्हणाले की, तेथील स्थानिक रहिवाशी भिमराव नलगे यांच्या घरी उपनिरिक्षक महावीर जाधव यांनी रात्री दारू पिवून गेले. तेथे जावून नलगे यांच्या घरातील महिलांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात टाकला. त्याचबरोबर भुजबळ यांना अश्लाघ्घ पध्दतीने शिवीगाळ केली. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याप्रकरणी पोलिस उपनिरिक्षक जाधव यास तात्काळ निलंबित करावी अशी मागणी केली.
त्यानंतर अजित पवार यांनी शासकिय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना एखाद्या लोकप्रतिनिधीमार्फत अनवधानाने कोणती गोष्ट झाली. तर त्या अधिकारी-कर्मचाऱ्याच्या समर्थनार्थ सर्व अधिकारी एकत्रित येत संप अथवा आंदोलन करतात. मात्र लोकप्रतिनिधीचा सन्मान न करता त्याला थेट शिवीगाळ हे अधिकारीच करतात. तेव्हा या अधिकाऱ्यांना कशाचा माज आलाय, कशाच्या आधारावर अशा गोष्टी करतात. म्हातारी मेलाचे दुःख नाही, पण काळ सोखावता नये त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, भाजपचे एकनाथ खडसे यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान केला पाहिजे अशी मागणी केली. त्याचबरोबर शिवसेनेचे सुनिल प्रभू यांनी भुजबळ यांना शिवीगाळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. याशिवाय शिवसेनेचे नागेश पाटील आष्टेकर आणि राजेश क्षिरसागर या दोन आमदारांनाही पोलिसांनी मारहाण केल्याची व्हीडीओ क्लीप विधानसभेत दिली होती. त्यास दोन वर्षे झाली तर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
सभागृहातील सदस्यांची भावना अखेर लक्षात घेवून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पोलिस उपनिरिक्षक महावीर जाधव यास सरकारने तातडीने निलंबित करावे असे आदेश राज्य सरकारला दिले.
त्यावर विखे-पाटील यांनी यासंदर्भात सर्वपक्षिय गटनेत्यांची बैठक घेण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्षांनीही त्यास होकार देत सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब केले.