राज्यात काहीही करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे सातत्याने पक्ष संघटना बांधणीसाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. तसेच त्यासाठी महिना-दोन महिन्यात पक्षाचा कार्यक्रमही घेत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्तीचा निर्णय जाहिर करण्याच्या आधी पवार कुटुंबियांची बैठक झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच इतक्या मोठ्या निर्णयाची पूर्वकल्पना देण्यासाठी झालेल्या बैठकीला आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्या बैठकीलाही जयंत पाटील यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याबाबत विचारले असता ते म्हणाले ‘ती राष्ट्रीय स्तरावरील बैठक असून, मला बोलावण्याची गरज वाटली नसेल’ असे वक्तव्य करत पाटील यांनी नाराजीचा सूर काढला आहे.
पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नवा अध्यक्ष निवडण्यासाठी समिती नेमली असून, त्या समितीची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे. मात्र, या बैठकीला जयंत पाटील हे उपस्थित नाहीत. ते पुण्यात एका कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली असता पाटील म्हणाले, ‘ती राष्ट्रीय स्तरावरील बैठक आहे. मला बोलविण्याची कदाचित गरज भासली नसेल आणि प्रत्येक बैठकीला बोलवले पाहिजे, असा आग्रह नसावा.’
माझे आणि सुप्रिया सुळे यांचे बोलणे झाले आहे. त्यामध्ये अशी बैठक झालेली नाही आणि बोलविण्यात आलेली नाही. माझे पवार यांच्याशीही बोलणे झाले आहे. सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. त्या बैठकीला मी पोहोचणार आहे” असे पाटील यांनी स्पष्ट केले.
तसेच जयंत पाटील पुढे म्हणाले, वज्रमुठ सभा ही उन्हाळ्यात घेणे अवघड होणार आहे. त्यामुळे एक मे रोजी रोजी झालेल्या अनौपचारिक बैठकीत तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे’ असेही स्पष्ट केले.