हनुमान चालिसावरून सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकिय नाट्यावरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी लक्ष्य केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देत म्हणाले की, जेव्हा गोष्टी जुन्या होतात, तेव्हा लोक विसरतात आणि सोयीच्या गोष्टी लक्षात ठेवतात. कोणी सरकार पाडलं मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं? मग पुन्हा काँग्रेसचं सरकार कोणी पाडलं? मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं? याचा इतिहास हा सगळ्यांनी बघितला आहे. अशाप्रकारे सरकारं पाडणं, काँग्रेस बाहेर पडणं, काँग्रेसमध्ये जाणं. अस्वस्थतेशिवाय थोडी होतं. कोणी स्वस्थ बसला आणि मॅच पाहतोय, तो थोडीच असं करतो असा पलटवार पवारांवर केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह अन्य पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
त्यामुळे काळजीचं कारण नाही, मी एकाच पक्षात आहे आणि माझा पक्ष सत्तेवर येणारच आहे. मला चिंता नाही असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिंमत असेल तर माझ्या विरोधात एफआयआर करा असे आव्हान देत हनुमान चालिसा पत्रकार परिषदेत म्हणून दाखविली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज(सोमवार) सकाळी पुण्यात माध्यमांशी बोलताना, “सत्ता गेल्यानतंर काही लोक अस्वस्थ होतात. सगळे काय माझ्यासारखे नसतात.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता.
याशिवाय खासदार नवनीत राणा यांचा पोलिसांकडून छळ करण्यात येत असल्याचा आरोप करत यासंदर्भात राणा यांनी लोकसभाध्यक्षांना पत्र लिहून त्याबाबतची माहिती दिली आहे. हनुमान चालिसावरून आमदार, खासदारांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तर विरोधकांवर जीवघेणे हल्ले करण्यात येत आहेत अशा पध्दतीची परिस्थिती आपण पहिल्यादांच राज्यात पहात असल्याचे सांगत केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपा कार्यकर्त्यांवर अशाच हल्ले करण्यात आले. तरीही भाजपा आपले काम करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात सध्या अहंकारी सरकार असल्यानेच या घटना घडत असल्याची टीका करत आमच्या पोलखोल यात्रेच्या रथावर हल्ला केलात, मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केलात. पण आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावर बोलतच राहणार असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच राज्यात हल्ला करण्याचे खोटे केसेस करण्यात येत असल्याने आम्ही भोंग्याप्रश्नी आयोजित सर्वपक्षिय बैठकीवर बहिष्कार घातल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.