काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ कर्नाटकात पोहचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसला लक्ष्य केले. त्याचबरोबर ‘संघाने ब्रिटिशांना मदत केली, तर स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड अर्थात भत्ता घ्यायचे,’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांनी केलेल्या त्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सवाल करत सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार का? असा सवाल केला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधीच्या वक्तव्याचा निषेध केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात भारतातील जनता होती. त्यामुळे काँग्रेसने वारंवार त्यांना अपमानित केलं. अकरा वर्षे अंदमानच्या कारागृहात त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. सावरकरांनी अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. इंग्रजांचे अत्याचार सहन करूनही अंदमानच्या कारागृहात सावरकर भारताच्या स्वातंत्र्याचा विचार करत होते. तसेच ते इतर कैद्यांचे मनोबलही वाढवित होते. अशा स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान काँग्रेस करत आहे. कारण राहुल गांधींना भारत आणि काँग्रेसचा इतिहास माहिती नाही, अशी टीका केली.
यावरून देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना सवाल विचारला आहे. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे निषेध करणार आहे की नाहीत? भारत जोडो का तोडो यात्रेच्या स्वागतासाठी शिवसेनेचे नेते पाठवणार आहेत का? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे, असा खोचक सवालही केला.
दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडा यात्रेला भारत जोडो की तोडा यात्रा अशी उपरोधिक टीकाही फडणवीस यांनी केली.