युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात झालेल्या दगडफेकीमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला असून . स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत गाफीलपणा केल्याचा तक्रार त्यांनी पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे
आदित्य ठाकरेंच्या दिशेने आलेले दगड जणू कुणीतरी त्या लोकांच्या हातात आणून दिले होते, असा संशय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे . स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत गाफीलपणा केल्याचा ठपका अंबादास दानवे यांनी ठेवला आहे.
शिवसेनेचे आमदार व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगावात काल शिवसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आले होते . याच वेळी रमाईंची मिरवणूकदेखील होती. या दोन्ही ठिकाणच्या गर्दीमुळे गोंधळ निर्माण झाला. मिरवणुकीतील डीजेचा आवाज कमी करायला सांगण्यात आला. त्यामुळे मिरवणूक थांबली आणि दोन गटांमध्ये वादावादी झाली. याच वेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचंही समोर आलं.
वैजापूर तालुक्यातील महालतगावात सभा सुरु असतानाही एक दगड मंचावर आला. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या दिशेनेही दगडफेक झाली. ज्या समूहाने दगडफेक केली, ते स्थानिक वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. दलित आणि हिंदू समाजात भांडण लावण्याचा प्रकार या समूहाने केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पत्र पाठवलं आहे. एसपी, आयजींशी बोलले स्थानिक पोलिसांवर ते कारवाई करतील, अशी अपेक्षा असल्याचं दानवे म्हणाले. ते म्हणाले, शिवशक्ती आणि भीमशक्तीत भांडणं लावून देण्याचा हा प्रकार आहे. यात मी कुणाला दोष देणार नाही. मात्र पोलिसांच्या बंदोबस्ताला एकही जबाबदार अधिकारी तिथे नव्हता. जी आयपीएस महिला होती, तिला यातलं कोणतंही ज्ञान नव्हतं असे दानवे यांनी म्हटले आहे .
आ रमेश बोरनारे असा प्रकार करणार नाही- राठोड
शिवसेना ठाकरेगटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या संदर्भात मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही काम करणारे लोक आहोत. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मला वाटतं की, आमदार रमेश बोरनारे हे अतिशय अभ्यासू आणि शांत व्यक्तिमत्व आहेत. ते असा प्रकार करणार नाहीत. हा प्रकार नक्की काय झाला हे मी पाहिलेला नाही ,याची अधिकृत माहिती घेऊनच मी बोलेन, असं संजय राठोड म्हणाले.