मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्वाची चर्चा सुरु असताना विधानसभेत एकही मंत्री उपस्थित नाही. याचा अर्थ सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नी गंभीर नसल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी करत सभागृहात बसायचे सोडून मंत्री आपल्या चेंबरमध्ये बसून काय अंडी उबवतात का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
विधानसभेत २९४ अन्वयेच्या प्रस्तावाखाली शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी, बोंडअळी- गारपीटमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आदी विषयांवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपले मत मांडण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभागृहात एकही राज्यमंत्री, मंत्री उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अजित पवार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करत मंत्र्यांना सभागृहात बोलावून आणा असे ठणकावून सांगत त्यांच्याशिवाय चर्चा सुरु करणार नसल्याचे निक्षूण सांगितले.
त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांना संबधित मंत्र्यांना बोलावून आणण्याचे आदेश दिले. त्यांच्या निरोपानंतर कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर हे तातडीने सभागृहात आले आणि थांबलेली चर्चा पुढे सुरु झाली.