Breaking News

अब्दुल सत्तार म्हणाले, नरहरी झिरवळांना हटविणार निकालासाठी थांबलो होतो पण आता नाही थांबणार

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाले. परंतु या दोन्ही नेत्यांचा शपथविधी होवून एक महिना पूर्ण झाला तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यापार्श्वभूमीवर बंडखोर शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाच्या निकालासाठी आम्ही थांबलो होतो. मात्र आता आम्ही थांबणार नाही. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आम्ही लवकरच करू असे स्पष्ट केले.

शुक्रवारी ५ ऑगस्ट रोजी अब्दुल सत्तार हे त्यांच्या मतदारसंघातील निधीच्या कामासाठी मंत्रालयातील वित्त विभागात आले होते. त्यावेळी मराठी ई-बातम्याच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बजाविलेल्या नोटीशीच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यासह अन्य प्रश्नीही एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्या विरोधात उध्दव ठाकरे यांच्या गटानेही शिंदे गटाच्या विरोधात याचिका दाखल केल्या. या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल होईल अशी आशा होती. मात्र दिवसेंदिवस न्यायालयाच्या निकाल लांबत चालला आहे यासंदर्भात सत्तार म्हणाले की, न्यायालयाचा निकाल काही एक दिवसात होणार नाही. त्यास वेळ लागणार आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी थांबणार नाही.

राज्य मंत्रिमंडळात कोणती खाती आम्हाला कोणती त्यांना द्यायची याबाबत काही गोष्टी अंतिम करायच्या होत्या. त्या अनुषंगाने चर्चा सुरु होती. त्यातही वेळ गेला. मात्र आता चर्चा जवळपास पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारात फारशी अडचणी येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच आम्ही अधिवेशन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नरहरी झिरवळ यांना उपाध्यक्ष पदावरून हटविणार

सर्वोच्च न्यायालयाने जर निकाल देताना २१ जूनची परिस्थिती निर्माण केली तर काय? असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, ती परिस्थिती होणार नाही. मात्र आगामी अधिवेशनात आम्ही उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना उपाध्यक्ष पदावरून हटविणार असून त्यादृष्टीने आम्ही तयारी पूर्ण केली असल्याचेही सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *