कोरोना काळापासून MPSC कडून जाहिर करण्यात आलेल्या सुधारीत परिक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयाविरोधात सातत्याने विरोध दर्शवित पुण्यात आंदोलन केले. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत MPSC प्रशासनाला विनंती करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानुसार विनंती पत्रही देण्यात आले. तरीही याबाबतचा सुधारीत निर्णय MPSCकडून जाहिर करण्यात न आल्याने अखेर पुन्हा आंदोलनास सुरुवात झाली. त्यावेळी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत फोनवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर ४८ तासाच्या आत MPSC ने आज ट्विट करत आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सुधारीत निर्णय ट्विटद्वारे जाहिर केला.
राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे.
‘या आंदोलनावर उमेदवारांशी आम्ही संवाद साधला होता. त्यांच्याशी वारंवार बोलत होतो. उपमुख्यमंत्र्यांनीही या तरुणांशी चर्चा केली होती. मंत्रीमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करून शासन उमेदवारांच्या भावनांशी सहमत असल्याचे आयोगाला कळवण्यात आले होते. उमेदवारांच्या भावना आणि हित लक्षात घेऊन आपण आयोगाकडे या नव्या परीक्षा पद्धतीसाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली होती. आयोगानेही या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल आयोगाला धन्यवाद देतो.’ असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची मागणी मान्य झाल्याचे सांगत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 23, 2023