ठाणे येथे एमएसआरडीसी व्यवस्थापकाच्या मुलाने तरुणीला मारहाण करून तिच्या अंगावर जाणीवपूर्वक गाडी घातली, त्यामुळे त्याच्या विरोधात आज रात्रीपर्यंत कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा हिवाळी अधिवेशनात हा विषय लावून धरणार असल्याचा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.
तसेच पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटिबद्ध असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
पीडित तरुणीची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज रुग्णालयात भेट घेतली व तिच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी महिला पोलीस अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी देखील उपस्थित होते.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, या घटनेतील अश्वजीत गायकवाड याने जाणीवपूर्वक गाडी अंगावर घातली व तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न करून जखमी केलं आहे. व्यक्तिगत विषय आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. अश्वजीत गायकवाड हा कोणाचा मुलगा आहे, कोण आहे काय आहे यापेक्षा पोलिसांनी कायद्याचं पालन करावे, अशी सूचना पोलिसांना दिली.
अंबादास दानवे म्हणाले की, पोलिसांनी फक्त बेधडकपणे गाडी चालविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेंच याप्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप करत अंबादास दानवे पुढे म्हणाले की, तसेच या घटनेत दुसरी व्यक्ती असती तर त्याला अटक केली असती. कायदा हा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे वैद्यकीय अहवालाप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करणे अपेक्षित असल्याचे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करून जर कारवाई केली नाही तर अधिवेनात हा विषय लावून धरणार असल्याचा इशारा दिला.
पीडित तरुणीच्या अंगावर जाणीवपूर्वक गाडी घेतली आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तो मुलगा कोणाचा आहे यापेक्षा पोलिसांनी कायद्याच पालन करावे अशी सूचना मी आज पीडित तरुणीची रुग्णालयात भेट घेतल्यावर पोलिसांना केली. आज रात्रीपर्यंत ३०७ चा गुन्हा दाखल केला नाही तर… pic.twitter.com/0fUge5TsmA
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 17, 2023