मुंबई : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाबाधीतांचे मृत्यूची आकडेवारी लपविली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रसारमाध्यमातूनही ही माहिती उघडकीस आली. त्यावर अखेर राज्य सरकारने यावर खुलासा देत मुंबईत ८६२ तर राज्यात ४६६ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी राहीली असल्याचे सांगत ही आकडेवारी फेरतपासणीत पुढे आल्याचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले.
कोविड-19 रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते. राज्य शासन या माहितीची स्वत:हून फेरतपासणी करते. समायोजन केलेली माहिती ही वेबपोर्टलवर सार्वजनिक केली जाते. त्यामुळे आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेण्याचे कारण असू नये, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदी कमी संख्येने दाखविण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांनी ठरवून दिलेल्या ICD-10 मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही केली जाते. त्याचे पालन करणे बंधनकारक आहे, या आधारे तसेच राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे मार्च, २०२० पासून कोविड-१९ प्रकरणाची पडताळणी करण्यात येत असून त्यानुसार समायोजन करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे. ११ जून रोजी राज्य शासनाने जिल्हा यंत्रणांना समायोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
राज्यात कालपर्यंत (१५ जुन २०२०) 1 लाख 10 हजार 744 कोविड पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यापैकी 50 हजार 554 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत व 4 हजार 128 मृत्युंची नोंद घेण्यात आली आहे आणि 56 हजार 049 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. परंतु राज्य शासनाने या डाटामध्ये फेरतपासणी करुन मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आणखीन ८६२ मृत्यू आढळून आले असून राज्यात ४६६ मृत्यू आढळले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मृत्युसमयी कोविड अहवाल पॉझिटीव्ह आला होता व या सर्व प्रकरणांची नोंद डेथ इन कोविड पॉझिटीव्ह म्हणून घेण्यात आली आहे.
फेरतपासणीमध्ये राज्यात पुढीलप्रमाणे मृत्यू संख्या आढळली. अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड ३, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड १४, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६ कोविड बाधित मृत्युची संख्या, त्याबाबतचे विश्लेषण, दैनंदिन आरोग्य वार्तापत्रांतून देखील पारदर्शकपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९९६ च्या तरतुदीनुसार मृत्यू प्रमाणपत्रामध्ये उचित नोंद घेऊन प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Tags ajoy mehata cevendra fadnavis cm uddhav thackeray covid-19 death rajesh tope
Check Also
नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार
नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …